शासकीय व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरल्याचा मराठवाडा शिक्षक संघाचा आरोप
परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रांवर दिनांक २८ जून रोजी प्रस्तावित असलेल्या टीईटी (TET) परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करावी लागणे ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. शासकीय व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरून निघालेली आहे, त्याचेच हे द्योतक असल्याची टीका मराठवाडा शिक्षक संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मुळात डी.एड. व बी.एड. ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्याची गरजच नाही. परंतु शिक्षकांच्या नोकरीवर टीईटीची टांगती तलवार लावण्यात आली आहे. आधीच विविध अशैक्षणिक कामांच्या बोजाखाली शिक्षक पार दबून गेला असून, त्यात अशा पद्धतीने पेपर फुटणे हे शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचीच नव्हे तर सरकारची विश्वासार्हता संपली आहे. नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीची जबाबदारी घ्यायला केंद्रीय शिक्षणमंत्री तयार नाहीत, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता टीईटी पेपरफुटीमुळे शिक्षकांना आत्महत्येस प्रवृत्त करायचे आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, अधिकारी यांना नोकरी लागल्यावर कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही, मग शिक्षकांनाच का? असा सूर सध्या शिक्षकांमध्ये आहे. खरं तर परीक्षा नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांना परीक्षा कशी घ्यावी, यासाठी एक परीक्षा अनिवार्य करावी, असा टोलाही त्यांनी लगावला. या पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई होणे नितांत गरजेचे आहे, तसेच महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी या पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी केली आहे.





