विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा
मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दक्षिण मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र तुलनेने कमी पाऊस राहील.मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि घाट परिसरात दरड कोसळण्याची शक्यता आहे. २९ जुलै रोजी विदर्भात, ३० जुलै रोजी पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा व कोकणात तर ३१ जुलै रोजी खानदेश आणि घाट परिसरात पावसाचा प्रभाव अधिक राहील. तसेच ३० आणि ३१ जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढेल.या पार्श्वभूमीवर सखल भाग, नदीकाठचे नागरिक आणि प्रवाशांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.





