परभणी ‘डाएट’च्या वतीने राज्य ग्रंथालय साहित्य निर्मिती कार्यशाळा उत्साहात

परभणी : साहित्य लिहिताना बालमनाचा विचार करून व बालकात समरस होऊन निर्माण होणारे आणि बालमनाचा ठाव घेते तेच खरे बालसाहित्य असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक कविवर्य इंद्रजित भालेराव यांनी केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) वतीने शुक्रवारी, २१ ऑगस्ट रोजी आयोजित राज्य ग्रंथालय साहित्य निर्मिती जिल्हास्तरीय शिक्षक व अधिकारी कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य सुदर्शन चिटकूलवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे, साहित्यिक केशव वसेकर, बा.बा.कोटंबे, उपेंद्र दुधगावकर, शोभा मोकले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ६५००० शाळातील ग्रंथालयात बाल साहित्य निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षकांतून उत्तम बालसाहित्य लेखन करणाऱ्या शिक्षकांची यासाठी निवड केली जाणार आहे. शिक्षकांचे लेखन अधिक समृद्ध व्हावे यासाठी ही कार्यशाळा आयोजिण्यात आली होती.श्री.भालेराव यांनी बाल साहित्य रंजकपणे कसे लिहावे, या विषयी सखोल मार्गदर्शन केले. श्री.वसेकर यांनी विविध दाखले देत लेखनविषयक माहिती दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य चिटकूलवार यांनी, वाचन समृद्ध होऊन लिखाण करा व विद्यार्थ्यांचेदेखील वाचन समृद्ध करा, असे आवाहन केले.
याप्रसंगी मागील वर्षी साहित्य निर्मितीमध्ये निवड झालेल्या बाल साहित्यिक शिक्षकांचा व नवोपक्रम स्पर्धातील क्रमांक प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यशाळत जिल्हाभरातील ४६ बालसहित्यिक शिक्षक यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन संतोष सेलूकर आणि प्रसन्न भावसार यांनी केले. तर आभार प्रा.गणेश शिंदे यांनी मानले.





