सेलू तालुका दबाव गटाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
सेलू : परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. निम्न दुधना नदीवर मोरेगावजवळ बंधारा आहे. सदर बंधारा परिसरातील १५ ते २० गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा करतो. या बंधाऱ्यात सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाने दडी मारल्याने भविष्यात नवीन पाणी साठवणूक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे तात्काळ बंद करावेत अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जर पुढे पाऊस पडलाच नाही, तर या बंधाऱ्यातून ज्या १५ ते २० खेड्यांना पाणीपुरवठा होतो, तो अडचणीत येण्याची शक्यता आहे. परिणामी तीव्र पाणीटंचाई आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्या या बंधाऱ्याचे दरवाजे काढून ठेवल्यामुळे पाण्याचा साठा सातत्याने कमी होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. भविष्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता जनावरांसाठी व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सदर बंधाऱ्यात पाणी साठवणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र संबंधित अधिकारी या आवश्यक बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे तात्काळ बंद करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक ॲड. श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ यांच्यासह ॲड. रामेश्वर शेवाळे, ॲड. देवराव दळवे, मुकुंद टेकाळे, आबासाहेब भुजबळ, सतिश काकडे, ॲड. योगेश सुर्यवंशी, लक्ष्मण प्रधान, योगेश काकडे, अक्षय बुरे, प्रकाश शिंदे, महादेव डोईफोडे, राजेंद्र केवारे, अजित मंडलिक, रौफ भाई, रामचंद्र कांबळे, गणेश सोळंके, ज्ञानेश्वर शेवडे, ॲड. उमेश काष्टे, दिलीप शेवाळे, दत्ता कांगणे, भारत रवंदळे आदींच्या स्वाक्षरीने उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.





