‘माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वाशिममध्ये जलसंधारण दिन ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशिम (फुलचंद भगत) : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ ला वाशिम शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी जवळपास ६ हजार नागरिकांनी नोंदणी केली. आमदार बाबूसिंग महाराज राठोड, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.
यावेळी आमदार बाबूसिंग महाराज राठोड, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक माधवराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, शिक्षणाधिकारी मंगला धुपे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्याम फेरवाणी, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रजत बिजवे, जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच सहायक अभियंता अपूर्वा नानोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पाण्याचे शाश्वत नियोजन करण्यासाठी स्व. सुधाकरराव नाईक यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून जलसंवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
एनसीसी विद्यार्थ्यांचे पथनाट्य; गोंधळातून जलसंवर्धनाचा जागर
महा वॉकेथॉनदरम्यान एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक पथनाट्य सादर करून जलसंवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोतांच्या जतनाचा संदेश दिला. गोंधळाच्या माध्यमातूनही जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. पारंपरिक कला आणि प्रभावी सादरीकरणातून देण्यात आलेल्या संदेशाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात सहभागी मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या संदेशातून जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढविण्याचा संकल्प करण्यात आला.
२५ विजेत्यांची ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड
महा वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमधून २५ विजेत्यांची ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. त्यामुळे सहभागी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जलसंधारण सप्ताहानिमित्त आयोजित मृद व जलसंवर्धन विषयावरील रील्स स्पर्धेच्या प्रवेशिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. युवकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मृद व जलसंवर्धनाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महा वॉकेथॉनमध्ये विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, माय भारत, नेहरू युवा केंद्र, होमगार्ड, विविध क्रीडा संस्था, व्यायामशाळा आणि स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.महा वॉकेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी जलसंधारण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. विविध विभागांच्या समन्वयातून आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून जलसंवर्धनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्यात आला.





