मंगरुळपीरचे ठाणेदार किशोर शेळके ‘वन मॅन आर्मी’ची भूमिका ठरली चर्चेचा विषय, कावड यात्रेतील प्रचंड गर्दीत स्वतः वाहतूक नियंत्रणाची कमान हाती
वाशिम (फुलचंद भगत) : मंगरुळपीर शहरात कावड यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात अचानक गर्दीने उच्चांक गाठला. पंचक्रोशीतील तसेच ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांतून मोठ्या संख्येने युवक कावड यात्रेत सहभागी झाल्याने शहरातील मुख्य चौकात मोठी गर्दी झाली. एकीकडे भक्तिमय वातावरण, तर दुसरीकडे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता अशा परिस्थितीत पोलिसांसमोर गर्दी नियंत्रणासोबतच वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. पोलिस विभागाचे शिलेदार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. मात्र गर्दीचा वाढता दबाव पाहता परिस्थिती अधिकच आव्हानात्मक बनत होती. याचवेळी मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रणाची कमान हाती घेतली.
ठाणेदार शेळके यांनी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेत काही क्षणांतच वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आणि स्वतः वाहनांची हालचाल नियंत्रित करण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली आणि कावड यात्रा कोणत्याही अडथळ्याविना पुढे मार्गस्थ झाली.विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकारी केवळ आपल्या अधिनस्त पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना देऊन वाहनात बसून परिस्थितीवर नजर ठेवतात, अशी सर्वसाधारण धारणा असते. मात्र ठाणेदार किशोर शेळके यांनी याला छेद देत ‘आदेश देण्यापेक्षा स्वतः मैदानात उतरून नेतृत्व करण्याची’ कार्यपद्धती दाखवून दिली.ठाणेदार स्वतः रस्त्यावर उतरल्याचे पाहून पोलिस कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह संचारला. वरिष्ठ अधिकारी स्वतः परिस्थिती हाताळत असल्याने पोलिस शिलेदारांना अतिरिक्त बळ मिळाले आणि सर्वांनी अधिक जोमाने गर्दी व वाहतूक नियंत्रणाचे काम केले. त्यामुळे कावड यात्रेतील उत्साह कायम ठेवत शहरातील वाहतूक व्यवस्थाही सुरळीत राखण्यात पोलिसांना यश आले.
‘वन मॅन आर्मी’ची भूमिका ठरली चर्चेचा विषय
कावड यात्रेदरम्यान ठाणेदार किशोर शेळके यांचा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रण करतानाचा प्रसंग उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरला. “ठाणेदार केवळ सूचना देणारे अधिकारी नाहीत, तर गरज पडल्यास स्वतः पुढे येऊन पोलिसिंगची कमान हाती घेणारे अधिकारी आहेत,” अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांमध्ये ऐकायला मिळाली.पोलिस दलात वरिष्ठांचे नेतृत्व केवळ आदेशांपुरते मर्यादित नसून प्रत्यक्ष कृतीतूनही दिसून येते, याचे उदाहरण या प्रसंगातून पाहायला मिळाले. वरिष्ठ अधिकारी स्वतः मैदानात उतरला की अधिनस्त कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास, उत्साह आणि काम करण्याची ऊर्जा अधिक वाढते, हेच कावड यात्रेतील या प्रसंगातून अधोरेखित झाले.कावड यात्रेचा धार्मिक उत्साह, युवकांची मोठी उपस्थिती आणि त्यातून निर्माण झालेली गर्दी यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू न देता वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. त्यातही ठाणेदार किशोर शेळके यांनी स्वतः रस्त्यावर उतरून बजावलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.नेतृत्व खुर्चीत बसून आदेश देण्यात नसते; गरज पडल्यास स्वतः रस्त्यावर उतरून जबाबदारी स्वीकारण्यात असते हेच ठाणेदार किशोर शेळके यांनी या प्रसंगातून दाखवून दिले.





