अनोळखी लिंक, OTP आणि बँक खात्याची माहिती देणे टाळा
फुलचंद भगत, वाशिम
सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकरणात बँक खात्यातून पैसे कपात झाल्याचा मेसेज आल्यानंतर संबंधित व्यक्तीने ‘नो’ असा प्रतिसाद दिला; मात्र त्यानंतरही खात्यातून रक्कम कपात झाली. त्यामुळे केवळ मेसेजला ‘नो’ किंवा ‘नाही’ असा प्रतिसाद देणे पुरेसे सुरक्षित नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका नागरिकाला त्याच्या बँक खात्यातून ऑनलाइन व्यवहाराद्वारे रक्कम कपात झाल्याचा संदेश आला. कोणताही व्यवहार केला नसल्याने त्याने मेसेजला ‘नो’ असा प्रतिसाद दिला. त्यानंतरही त्याच्या खात्यातून पैसे कपात झाल्याचे निदर्शनास आले.?सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे संदेश फिशिंग फ्रॉडचा भाग असू शकतात. सायबर चोरांकडून बँक, कुरिअर, केवायसी, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन व्यवहार किंवा खाते सुरक्षित करण्याच्या नावाखाली बनावट संदेश पाठवले जातात. संदेशासोबत लिंक, फोन नंबर किंवा इतर पर्याय दिले जातात.
नागरिकांनी अशा संदेशातील लिंकवर क्लिक करून OTP, PIN, CVV, पासवर्ड, UPI PIN किंवा बँक खात्याची माहिती देऊ नये. बँकेकडून आलेला असल्याचे भासवणारा संदेश असला तरी त्याची खात्री अधिकृत माध्यमातूनच करावी.काही फसवणुकींमध्ये नागरिकांना, ‘हा व्यवहार तुम्ही केला नसेल तर NO रिप्लाय करा’ असा संदेश पाठवला जातो. अशा वेळी घाईघाईने कोणत्याही लिंकवर क्लिक करणे किंवा संदेशाला प्रतिसाद देण्याऐवजी थेट आपल्या बँकेच्या अधिकृत अॅप/वेबसाइटवरून व्यवहार तपासा.तसेच खात्यात संशयास्पद व्यवहार दिसल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधून कार्ड/खाते सुरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करावी.
नागरिकांनी या गोष्टी लक्षात ठेवाअनोळखी लिंकवर क्लिक करू नका.कोणालाही OTP, UPI PIN, ATM PIN किंवा CVV सांगू नका.’खाते बंद होईल’, ‘पैसे परत मिळवण्यासाठी लिंक उघडा’ अशा दबावाच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका.बँकेचा नंबर शोधताना इंटरनेटवर मिळालेल्या संशयास्पद नंबरऐवजी बँकेच्या अधिकृत माध्यमाचा वापर करा.मोबाइलमध्ये अनोळखी अॅप किंवा रिमोट अॅक्सेस अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितल्यास नकार द्या. बँक खात्यातील व्यवहारांचे SMS/अॅप नोटिफिकेशन नियमित तपासा. फसवणूक झाल्यास वेळ न दवडता सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क करून तक्रार नोंदवा.
सायबर फसवणुकीत काही मिनिटांचा विलंबही आर्थिक नुकसान वाढवू शकतो. त्यामुळे ‘मेसेज आला म्हणजे खरा’ असा समज न ठेवता प्रत्येक अनोळखी संदेशाची पडताळणी करा. स्वतः सतर्क राहा आणि कुटुंबीय, मित्र व ज्येष्ठ नागरिकांनाही या प्रकारच्या फसवणुकीबाबत जागरूक करा असे आवाहन पोलिस दलाच्या सायबर विभागाकडुन केले आहे.





