गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण टाळण्याचे पोलिसांचे आवाहन; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
वाशिम : गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि आनंदाचा उत्सव आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची प्रत्येक मंडळाने आणि नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः मोठ्या आवाजातील डिजे, ध्वनिक्षेपकांचा कर्णकर्कश आवाज आणि रात्री उशिरापर्यंत होणारा ध्वनीप्रदूषणाचा त्रास टाळावा, असे आवाहन मंगरुळपीर पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहर आणि ग्रामीण भागात विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उत्सवाला पारंपरिकतेची जोड देत ढोल-ताशे, लेझीम, झांज, टाळ-मृदंग यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाचे स्वागत व विसर्जन मिरवणुका पार पाडाव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अनेकदा उत्सवाच्या नावाखाली मोठ्या आवाजात डिजे वाजविला जातो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ध्वनिप्रदूषणाचा परिणाम परिसरातील शांततेवरही होतो. त्यामुळे उत्सवाचा आनंद घेताना इतरांच्या हक्कांचा आणि आरोग्याचा विचार करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.*वेळेचे व ध्वनीमर्यादेचे भान ठेवण्याचे आवाहन*गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिक्षेपक आणि वाद्यांचा वापर करताना शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीमर्यादा व वेळेच्या नियमांचे पालन करावे. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मंडळांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून उत्सव शांततेत पार पाडावा, असेही ठाणेदार किशोर शेळके यांनी सांगितले.*पोलिस प्रशासनाची करडी नजर*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर पोलिसांकडून शहर व तालुक्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त, गस्त तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, असे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.*‘उत्सव संस्कृती जपणारा असावा’*गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचा नव्हे, तर महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्याचा उत्सव आहे. त्यामुळे डिजेच्या दणदणाटापेक्षा पारंपरिक वाद्यांचा निनाद, सामाजिक उपक्रम, प्रबोधनपर कार्यक्रम आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावे. “गणरायाचा उत्सव उत्साहात साजरा करा; मात्र त्यातून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या,” असा संदेश ठाणेदार किशोर शेळके यांनी गणेशभक्त व गणेश मंडळांना दिला आहे.
वार्तांकश : फुलचंद भगत





