वाशिम: नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथे दि. २ व ३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “Life and Legacy of Chhatrapati Shivaji Maharaj – Jayishnu Saviour of Sahishnu Bharat” या राष्ट्रीय परिसंवादात मंगरुळपीर येथील ज्येष्ठ अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते व प्राध्यापक प्रा. हरिदास तुळशीरामजी ठाकरे यांनी सहभाग नोंदवून जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिसंवादात देशभरातील इतिहास संशोधक, प्राध्यापक, विचारवंत, विद्यार्थी आणि शिवचरित्र अभ्यासक सहभागी झाले होते.परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी JNU च्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित, भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते व राज्यसभा खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी, तंजावरच्या भोसले घराण्याचे वंशज श्री बाबाराजे भोसले, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज श्री रघुजीराजे आंग्रे, तसेच रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह व शिवशंभू विचारमंचाचे राष्ट्रीय संयोजक श्री सुधीर थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.दोन दिवस चाललेल्या या परिसंवादात छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रकारण, सुशासन, लष्करी रणनीती, आरमार, दक्षिण दिग्विजय, धार्मिक सहिष्णुता, मराठा साम्राज्याचा विस्तार आणि आधुनिक भारतातील शिवचरित्राचे महत्त्व या विविध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली.यावेळी प्रा. हरिदास ठाकरे यांनी अनेक राष्ट्रीय स्तरावरील इतिहास संशोधक, अभ्यासक आणि शिवचरित्र तज्ज्ञांशी संवाद साधला. तसेच तंजावरच्या भोसले घराण्याचे वंशज श्री बाबाराजे भोसले, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री रघुजीराजे आंग्रे, तसेच शिवकालीन इतिहासाशी संबंधित अनेक मान्यवरांशी भेट घेऊन विचारांची देवाणघेवाण केली.परिसंवादाच्या समारोप सत्रात कुलगुरू प्रा. शांतिश्री पंडित, सुधीर थोरात, डॉ. केदार फाळके, प्रा. सुनील डांगे, प्रा. हिरामण तिवारी तसेच SIS चे डीन प्रा. मुठू उपस्थित होते.या राष्ट्रीय परिसंवादातील सहभागाबाबत प्रा. हरिदास ठाकरे यांनी सांगितले की, “दिल्लीतील प्रतिष्ठित JNU विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर झालेली सखोल चर्चा ऐकण्याची संधी मिळाली. शिवरायांचे विचार केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारताच्या राष्ट्रचिंतनाला दिशा देणारे आहेत. या परिसंवादातून इतिहासाचा नव्याने अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.
“मंगरुळपीरसारख्या ग्रामीण भागातील अभ्यासकाने राष्ट्रीय स्तरावरील या महत्त्वपूर्ण परिसंवादात सहभाग नोंदविल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.?”रायगड ते दिल्ली : शिवरायांच्या विचारांचा राष्ट्रीय जयघोष अनुभवण्याचे भाग्य लाभले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.” – प्रा. हरिदास ठाकरे





