सेलू बाजार समितीत हालचालींना वेग
सेलू : सेलू बाजार समितीचे सभापती चक्रधर पौळ यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण दाखवून सोमवारी, ८ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी संचालक डॉ.संजय रोडगे, शैलेश तोष्णीवाल, अनिल पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, पौळ यांच्या राजीनाम्यानंतर सभापतीपदी संचालक डॉ.संजय रोडगे यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे.
मागील अनेक महिन्यापासून सभापती पौळ यांचे पद रद्द करण्यासाठी विरोधकांनी दंड थोपटले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलचे अठरा पैकी सर्वाधिक अकरा संचालक निवडून आले होते. तर भारतीय जनता पक्षाच्या पॅनलचे सात संचालक विजयी झाले होते. बहुमताने बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे चक्रधर पौळ यांची निवड झाली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीत पौळ यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर त्याआधीच संचालक वर्षा सोळंके आणि अनिता ताठे या भाजपात दाखल झाल्या होत्या. त्यामुळे संख्याबळात बाजार समितीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले.
दरम्यानच्या काळात बाजार समितीतील अनियमितेवरून संचालकांनी सभापतीच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. प्रश्न उभे केले होते. त्यानंतर चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सभापती पौळ यांना अपात्र, तर सचिव राजीव वाघ यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे बाजार समितीचा कारभार ठप्प झाला होता. सुरळीतेसाठी संचालकांनी ठराव घेऊन स्वाक्षरीचे अधिकार संचालक डॉ.संजय रोडगे यांना दिले होते. तर सभापती पौळ यांनी अपात्रतेला आव्हान दिल्यानंतर त्यांना संबंधित विभागाकडून दिलासाही मिळाला होता. परंतु, पौळ यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत सोमवारी सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन सभापती निवडीसाठी अद्याप कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मात्र, संचालक डॉ.संजय रोडगे यांची सभापतीपदी वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे.
पुनर्वैभव प्राप्त व्हावे
सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात २४ ऑक्टोबर १९३१ रोजी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्तव्यदक्ष असलेल्या अनेक संचालक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाजार समितीला वैभव प्राप्त करून दिलेले आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून व्यवहारातील अनियमितता, अंदाधुंद कारभार आणि विविध कारणांमुळे बाजार समिती चौकशीच्या फेऱ्यात अडकली. यामुळे परिसरातील चैतन्यच एकप्रकारे हरवल्याचे चित्र निर्माण झाले. आगामी काळात बाजार समितीला पुनर्वेभव प्राप्त करून देण्यासाठी पदाधिकारी, संचालक आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





