परभणी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी सेलू तालुक्यातील नऊ गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात गुरूवारपासून सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. रविवारी उपोषणाचा चौथा दिवस होता.
१५ ऑगस्ट रोजी बैलगाड्यांसह भरपावसात सहा तासांत आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनेचे नेते लक्ष्मण वडले यांनी प्रशासनाच्या धोरणांवर कडाडून टीका केली. आंदोलनाचे चार टप्पे करण्यात येतील. त्यात पहिला टप्पा सत्याग्रह सुरू राहिल, दुसरा टप्पा रस्त्यावर आंदोलन, तिसरा टप्पा न्यायालयाचे आंदोलन, चौथा प्रशासनातील अधिकाऱ्यांची मस्ती जिरविण्यासाठी गोपनीय आंदोलन सुरू राहणार आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे अमृत शिंदे, गणेश पाटील, भागवत बोबडे, विश्वंभर गोरवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. उपोषणकर्त्यांमध्ये रमेश माने, गणेश मुंडे, दता देशमाने, मारोती बोडखे, जीवन गाडेकर, दता गाडेकर आदींचा समावेश आहे. रामेश्वर गाडेकर, प्रशांत नाईक, रघुनाथ टाके, सुनील लिपणे, गोविंद गाडेकर, निशांत मुंडे आदींसह नऊ गावातील महामार्ग बाधीत अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, प्रशासनाने या उपोषणाकडे दुलर्क्ष केल्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.





