इतिहासकार सरफराज अहेमद यांचे प्रतिपादन, सेलू येथे अल फलाह एज्युकेशनतर्फे गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा गौरव सोहळा उत्साहात
सेलू : स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिम समाजाचे योगदान अतिशय मोलाचे आहे, असे मत सरफराज अहेमद (सोलापूर) यांनी व्यक्त केले. ते मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. अल फलाह एज्युकेशन अँड वेल फेअर सोसायटी सेलू तर्फे मुस्लिम समाजातील इयत्ता दहावी, बारावी, सीइटी, शिष्यवृत्ती, बीडीएस व इतर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव २८ जून २०२६ रोजी करण्यात आला. अध्यक्षस्थानी साईबाबा बँकेचै व्यवस्थापक निसार खान पठाण होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सरफराज अहेमद, विद्यार्थी मित्र सल्लागार प्रा. शेख रफिक (परभणी), मदीना मस्जिदचे इमाम मौलाना खाजा नदवी, अल फलाह एज्युकेशन वेलफेअर सोसायटी सचिव शफिक अली खान, पुरस्कारकर्ते जकीयोद्दीन खतीब (परभणी), गुलाम मोहमद मिठू (परभणी), डॉ. मुजमील खान, महेमूद सर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात कुराणचे आयात इमाम सर तर नाते कलिमा बशीरा मोबीन खान यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे जकीयोद्दीन खतीब व गुलाम मोहमद मिठू यांनी आपले विचार व्यक्त केले.प्रा. रफिक शेख यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला व प्रश्नांचे उत्तर देऊन समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप निसार पठाण यांनी केला.
प्रास्ताविक अल फलाह एज्युकेशन अँड वेल फेअर सोसायटीचे अध्यक्ष इंजिनिअर अनिस कुरेशी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे परिचय इम्रान कुरेशी यांनी करून दिला. सेवानिवृत्त शिक्षक सलीम मोमीन, अब्दुल मजीद तसेच असिफ कुरेशी यांनी आपल्या मुलाचे लग्न सामान्य पद्धतीने करून खर्च टाळून, अल फलाह सेवाभावी संस्थेला ११००० रुपयांचा चेक दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शेख हारून बागवान यांनी केले, तर रशीद खान पठाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पठाण रशीद खान, शेख शमशोद्दीन, हाजी रफिक सर, शेख असगर, शेख इमाम, जकी सर, सिद्दीकी इम्रान कुरेशी, जावेद घोरी, मौजम सर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मुले, मुली व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे सरफराज अहेमद म्हणाले की, मुस्लिम समाजात मुलीच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे ही समाधानाची बाब आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये मुस्लिम समाजाचे योगदान अतिशय मोलाचे आहे. इतिहास तरुण पिढी पुढे आणणे प्रत्येक नागरिकाचे काम आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास उपस्थितांना सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. मुस्लिम युवकांनी जुना इतिहास वाचून आकलन करणे गरजेचे आहे. फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे ही काळाची गरज आहे. समाज फार मागसलेला आहे, प्रत्येक क्षेत्रात उणीव आहे. सध्याच्या काळामध्ये मध्ययुगीन इतिहासाचा वापर हा मुस्लिम खच्चीकरण करण्यासाठी केला जात आहे. पुढे बोलताना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम सैनिकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. अनेकांना कारावास भोगावा लागला, अनेक मुस्लिम बांधव स्वातंत्र्य चळवळीत शहीद झाले आहेत.





