उमेदवारांकडून पारदर्शक चौकशीची मागणी
सेलू : महाराष्ट्रातील लाखो शिक्षक भरतीच्या उमेदवारांमध्ये टीईटी परीक्षा अचानक पुढे ढकलल्यानंतर तीव्र नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न बाहेर गेल्याच्या संशयामुळे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेमुळे केवळ टीईटी परीक्षेवरच नव्हे, तर संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी शासनाने ३१ मे, १५ जून आणि त्यानंतर ३० जून अशी वारंवार मुदतवाढ दिली. प्रत्येक वेळी संचमान्यता, बिंदुनामावली आणि रिक्त पदांची माहिती अंतिम न झाल्याचे कारण समोर आले. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या नियोजनाबाबत उमेदवारांमध्ये विविध शंका निर्माण होत आहेत. राज्यातील अनेक संस्थांची संचमान्यता अद्याप प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अनेक शाळांची बिंदुनामावली आणि रिक्त पदांची अंतिम माहितीही अद्याप पूर्ण झालेली नसल्याने भरती प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत स्पष्टता नसल्याची भावना उमेदवार व्यक्त करत आहेत. टीईटी परीक्षा स्थगित होण्याच्या घटनेनंतर उमेदवारांकडून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वारंवार मुदतवाढ देण्यामागील नेमकी कारणे काय? राज्यातील किती संस्थांची संचमान्यता आणि बिंदुनामावली अद्याप प्रलंबित आहे? पवित्र पोर्टलवरील अंतिम जाहिरात नेमकी कधी प्रसिद्ध होणार? तसेच टीईटी प्रश्नपत्रिका बाहेर जाण्याच्या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणार का, अशी मागणीही उमेदवारांकडून केली जात आहे.
उमेदवारांचे म्हणणे आहे की, त्यांचा उद्देश कोणावरही आरोप करण्याचा नसून संपूर्ण प्रक्रियेबाबत स्पष्टता आणि पारदर्शकता मिळावी हीच अपेक्षा आहे. लाखो TAIT व TET पात्र उमेदवार अनेक महिन्यांपासून भरती जाहिरातीची प्रतीक्षा करत असून प्रत्येक विलंबामुळे त्यांच्यातील अस्वस्थता वाढत आहे. याप्रकरणी शासनाने संचमान्यता, बिंदुनामावली, रिक्त पदांची अंतिम संख्या, भरतीचे वेळापत्रक आणि टीईटी प्रकरणातील चौकशी अहवाल सार्वजनिक करून उमेदवारांचा विश्वास दृढ करावा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. – निशिकांत पाटील, सहसचिव,डी.एड. बी.एड. स्टुडंट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य
–





