खासदार संजय जाधव यांची स्पष्टोक्ती, सेलूतील मेळाव्यात शिवसैनिकांशी साधला मनमोकळा संवाद
सेलू जि.परभणी : वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली मूळ शिवसेना जिल्ह्यात खऱ्या अर्थाने टिकावी, संघटना मजबूत व्हावी यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जड अंतःकरणाने पक्षप्रवेश करावा लागला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन खासदार संजय जाधव यांनी केले. माजी आमदार हरिभाऊ लहाने आणि तालुकाप्रमुख तथा नगरपालिकतेतील गटनेते संदीप लहाने यांच्या पुढाकाराने शुक्रवारी, ३ जुलै २०२६ रोजी आयोजित शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्यात सत्कारप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. पुढील काळात सर्वांनी संघटित राहून संघर्ष करण्याची गरज असून, बाळासाहेबांनी लावलेले हे शिवसेनेचे रोपटे अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने मनापासून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
याप्रसंगी माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, राजू कापसे, भास्कर लंगोटे, विनायकराव खंडागळे, नगरसेवक डॉ.अनिकेत जोगदंड, अनुपमा देवधर, सपना काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात खासदार जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार जाधव पुढे म्हणाले, ” मी पूर्वीपासून शिवसेनेचाच असून आजही त्याच विचारांशी बांधील आहे. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला सामाजिक बांधिलकीचा विचार घेऊनच शिवसैनिक काम करतात. मात्र, गेल्या काही काळात पक्षाची ध्येयधोरणे बदलल्यामुळे आणि कामे होत नसल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जड अंतःकरणाने मला पक्षप्रवेशाचा निर्णय घ्यावा लागला,” अशीही मनमोकळी भूमिका खासदार जाधव यांनी मांडली. भविष्यात जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमतरता भासणार अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात १९८६ चा शिवसेनेचा झंझावात दिसून येत असल्याचे प्रास्ताविकात संदीप लहाने यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोपात माजी आमदार लहाने म्हणाले, की शिवसैनिक लढण्यास तयार आहेत. आता खासदार जाधव यांच्या रूपाने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा जिल्ह्याला नेता मिळाला आहे. शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने समोर येत आहे. शिवसेनेचे तत्व स्वीकारून कोणी पक्ष प्रवेश करत असेल, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर शिवसैनिकांना पाहिजे तो मान सन्मान मिळत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक डॉ.अनिकेत जोगदंड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा मिळावी यासाठी फिरते रुग्णालयाच्या फलकाचे उदघाटन यावेळी खासदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, तसेच महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले, तर रामेश्वर बहिरट यांनी आभार मानले.





