निवृत्त जिल्हाधिकारी विजयकुमार फड यांचे प्रतिपादन, स्व. जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमाला
सेलू जि.परभणी : मनावरचे ओझं म्हणजेच ताण असून तो परिस्थितीपेक्षा मनस्थितीमुळे जास्त निर्माण होतो. स्वतःवर प्रेम करायला शिकल्यास जगावर प्रेम करणे सोपे जाते. संसारात तक्रारी करण्यापेक्षा आनंदाने जगणे हाच खरा परमार्थ असून ज्ञानेश्वरी हा जीवनातील सर्व प्रश्नांवरील उपाय आहे, असे प्रतिपादन निवृत्त जिल्हाधिकारी आणि ज्ञानेश्वरी अभ्यासक विजयकुमार फड यांनी केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित, स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल आयोजित आणि देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्या वतीने आयोजित स्व. जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेच्या १४ व्या वर्षातील पहिले पुष्प २३ फेब्रुवारी रोजी गुंफताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आनंद गुजर होते. व्यासपीठावर हरिभाऊ चौधरी व उपेंद्र बेल्लुरकर यांची उपस्थिती होती.
‘समग्र ज्ञानेश्वर माऊली’ या विषयावर मार्गदर्शन करताना श्री. फड म्हणाले की, ज्ञानेश्वरी केवळ ग्रंथ नसून ती संजीवन शक्ती देणारे शास्त्र आहे. माणसाच्या आयुष्याची गाडी जेव्हा काम, क्रोध, ईर्ष्या आणि अहंकारामुळे पंक्चर होते, तेव्हा ज्ञानेश्वरीच्या गॅरेजशिवाय पर्याय राहत नाही. ज्ञानेश्वरी, हरिपाठ आणि चांगदेव पासष्टीमध्ये संजीवन शक्तीचे शब्द असल्याने तिथे आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. आज अनेकजण संभ्रमात असल्याने भविष्य पाहण्यासाठी इकडे तिकडे धावतात, परंतु भूत आणि भविष्याचे ज्ञान केवळ त्या विश्वनियंत्या पांडुरंगाच्या हाती आहे. त्यामुळे वारंवार भविष्य विचारण्यापेक्षा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवंताच्या चरणी लीन होणे महत्त्वाचे आहे.
श्री.फड यांनी नम्रतेचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की, जो नम्र होतो त्यालाच थोरपण प्राप्त होते. आपण कितीही मोठे पद भूषवत असलो किंवा कितीही पगार घेत असलो, तरी त्या चौदा भुवनांच्या मालकाला जागृत करण्यासाठी स्वतः आधी जागे होणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वरी आपल्याला मी कोण आहे याची ओळख करून देते. भक्ती म्हणजे केवळ माळ घालणे किंवा उपास करणे नसून, भेदाभेद सोडून स्वतःसह सर्वांमध्ये भगवंत पाहणे म्हणजे खरी भक्ती होय. भगवंताने दिलेले हात टाळी वाजवण्यासाठी आणि मदतीसाठी आहेत, तर पाय पंढरीच्या वाटेने चालण्यासाठी आहेत.
व्याख्यानादरम्यान त्यांनी कौटुंबिक नातेसंबंधांवर मार्मिक भाष्य केले. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांच्या नात्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, ज्या दिवशी समाजात भाऊ-बहिणींमध्ये असे निस्वार्थ प्रेम निर्माण होईल, त्या दिवशी न्यायालयातील ५० टक्के भांडणे आपोआप मिटतील. मोठेपणा मिरवण्यापेक्षा आपल्या माणसांना मोठे करण्यात खरा आनंद असतो. केवळ नामघोष न करता त्यांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. ज्ञानेश्वरीचे वाचन करणाऱ्याला कळीकाळाचे भय राहत नाही, म्हणूनच मरण्यापूर्वी प्रत्येकाने किमान एकदा तरी ज्ञानेश्वरीचे पारायण करावे आणि ही साधना उद्यावर ढकलून नये, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
प्रास्ताविक उपेंद्र बेल्लूरकर यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांनी दिला. सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले आणि विकास पिंगळे यांनी आभार मानले. सीमा आष्टीकर यांनी गायलेल्या सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.





