आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होणार, गडबड करणाऱ्यांवर करडी नजर : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

परभणी : हजरत सय्यद शहा तुराबूल हक यांच्या उरुस निमित्ताने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नुमाईशचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते नुमाईशचे शानदार उद्घाटन रविवारी करण्यात आले. या वर्षी पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीची संकल्पना अमलात आणली आहे. यामुळे उरुसात गडबड-गोंधळ करणाऱ्यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. जो कोणी गडबड करेल, त्याचवर कडक कार्यवाई केली जाईल, असा इशारा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख, तहसीलदार संदीप राजपुरे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कासले, ट्राफिक पोलीसचे बेले, गणेश कदम, उरूस समितीचे उपाध्यक्ष निहाल अहमद, वक्फ अधिकारी इम्रान नदवी, रामेश्वर अवचार, संजय गजेगावकर, व्यापारी संघटनेचे अश्फाकभाई, अजमतखान, चांद भाई, वक्फ मंडळाचे शेख सलमान, सैफ मणियार, मुदसीर शेख, इत्यादी उपस्थित होते.नुमाईश उदघाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी चव्हाण यांचे नाव उरूस व्यवस्थापक खुसरो खान यांनी सूचित केले.
हजरत सय्यद शाह तुराबूल हक दरगाह राज्य वक्फ मंडळाच्या देखरेखीखाली असून या वर्षी उरूस मैदानात तब्बल सहाशेच्या वर विविध साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत.परभणी जिल्ह्याबरोबर मराठवाड्यातील लाखो भाविक उरुसास हजेरी लावतात. घरगुती व इतर साहित्य विक्री करणारे बाहेरच्या राज्यातून ही येत असतात म्हणून महिला व बालवर्गासाठी नुमाईश पर्वणी ठरत असते.येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक पोलीस बंदोबस्त व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.तसेच भाविकांना पिण्याच्या पाणी, धूळधाण होऊ नये म्हणून टँकरद्वारे पाण्याचा शिडकावा करण्यात येणार आहे.अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, सर्व्हीलन्स व्हॅन, अग्निशमन गाडी तैनात करण्यात आली आहे.उरूस दरम्यान निरंतर वीज व्यवस्थेसाठी महावितरण अधिकारी व कर्मचारी विशेष मदत करत आहे.
शिस्त पाळा, कायद्याचे पालन करा : जिल्हाधिकारी
आपल्या भाषणात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या तसेच उरुसात येणाऱ्या भाविकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले. सय्यद तुराबूल हक यांच्या विचार, आपसातील प्रेमाचा, सहनशीलतेचा संदेश, देशातील सुफी संतांची परंपरा विषय अभ्यासू माहिती विशद केली. साफ सफाई ठेवा, आरोग्यासाठी बाधित असलेले पदार्थ खाऊ नका, आढळल्यास तक्रार करा, असे आवाहनही केले.सुरुवातीला वक्फ मंडळाचे विशेष अधीक्षक व उरूस व्यवस्थापक खुसरो खान यांनी प्रास्ताविक केले, तद्नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून नुमाईशचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन झियाओद्दीन यांनी तर आभार जिल्हा वक्फ अधिकारी इम्रान नदवी मानले.





