प्रशासनाची मनमानी, भूसंपादन प्रक्रियेत मोठा अन्याय होत असल्याचा आरोप
सेलू जि.परभणी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी सेलू तालुक्यातील नऊ गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात गुरूवारपासून (१४ ऑगस्ट) सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, भूसंपादन करतानाजमिनीचा दर अत्यंत कमी दिला जात आहे. २०१४ च्या शासकीय रेडी रेकनरनुसार केवळ १ लाख ८० हजार रुपये प्रति एकर दर ठरवण्यात आला आहे. हा दर कवडीमोल आहे. जमिनीचे चुकीचे वर्गीकरण करून अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींना कोरडवाहू किंवा हंगामी जमिनी म्हणून दाखवण्यात आले आहे. यामुळे त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. फळबागांचे अयोग्य मूल्यांकन करण्यात आले आहे. कृषी विभागाने फळबागांचे मूल्यांकन करताना झाडांऐवजी केवळ रोपांचे मूल्यांकन केले आहे. याशिवाय इतर विहिरी, पाईपलाईन आणि घरे यांसारख्या इतर मालमत्तांचे मूल्यांकनही योग्य प्रकारे करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या मनमानी धोरणाविरोधात न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांमध्ये रमेश माने, गणेश मुंडे, दता देशमाने, मारोती बोडखे, जीवन गाडेकर, दता गाडेकर आदींचा समावेश आहे. निवेदनावर रामेश्वर गाडेकर, प्रशांत नाईक, रघुनाथ टाके, सुनील लिपणे, गोविंद गाडेकर, निशांत मुंडे आदींसह नऊ गावातील महामार्ग बाधीत अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. दरम्यान, गुरूवारी उपोषणस्थळी प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकला नाही.





