केमापूरच्या शिक्षकांसह १२ ग्रामस्थांचा अवयवदानाचा संकल्प
‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमात अवयवदान पंधरवड्याची जनजागृती
सेलू : ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत, बुधवार, १३ ऑगस्टरोजी जिल्हा परिषद शाळा, केमापूर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या प्रेरणेने आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णकुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदान पंधरवड्याची जनजागृती करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक डॉ.शरद ठाकर यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शाळेतील पाचही शिक्षकांसह १२ ग्रामस्थांनी अवयव व उती दान करण्याची नोंदणी करून अवयवदानाचा संकल्प केला.
डॉ. शरद ठाकर यांनी अवयवदानासंदर्भातील गैरसमज दूर करून त्याचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले, “राष्ट्रीय अवयव व उती प्रत्यारोपण संस्था (NOTTO) च्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे ८ गरजूंना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे मृत्यूनंतरही अवयवदान करून गरजूंचे प्राण वाचवावेत.”
कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे आणि गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नारायण आष्टकर यांनी केले. प्रास्ताविक दगडुबा माघाडे यांनी केले, तर प्रणिता गाडे यांनी आभार मानले. प्रभावती घुगे आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. दरम्यान, डॉ. कृष्णकुमार चौधरी यांनी या वेळी अवयवदान ही एक व्यापक जनचळवळ बनली पाहिजे, असे मत व्यक्त केले.





