परभणीत त्रैभाषिक कवी संमेलनातून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
परभणी : येथील सर्वधर्मीय फुले शाहू- आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने १० एप्रिल रोजी आयोजित त्रैभाषिक कवी संमेलनातून क्रांतीबा ज्योतीबा फुले यांना आगळेवेगळे अभिवादन करण्यात आले. जगणे शोषितांचे तुम्हीच बदलले सारे, आता त्यांच्या मुठीत सूर्य चंद्र तारे… या शब्दांत महोत्सवाचे निमंत्रक यशवंत मकरंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कवी संमेलनाचे अध्यक्ष इंजि. डॉ. विवेक जनार्दन मवाडे यांनी ‘मुडदे’ या कवितेतून ” मुडदे असतात आपल्या आजूबाजूला… शहरात, गावात आणि घरात सुद्धा, ” अशा शब्दांत निष्क्रिय आयुष्य जगणाऱ्यांवर आसूड ओढले. तसेच मेरा हिंदुस्तान प्यारा हिंदुस्तान, कितनी उल्फत यहा… कितनी शरफत यहा… या ओळींतून देशातील कर्तृत्ववान लोकांचा सन्मान केला. सविता वडगावकर यांनी फुले, शाहू, आंबेडकरांनी समाजात क्रांती घडवली आणि त्यांच्या प्रेरणेतून विचारांची ज्योती उजळली, अशा भावना मांडल्या. संतोष नारायण यांनी द्रोणाचार्यच भेटले पदोपदी हर जागी, एकलव्यावानी मग मीच माझा गुरु झालो, ही कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.रात्री १२ वाजेपर्यंत रंगलेल्या या संमेलनात ज्येष्ठ कवी प्रेमानंद बनसोडे, एम. एम. भरणे, दि. क. लोंढे, दुर्गानंद वाळवंटे, प्रा. अंजली धुतमाल, अनिताताई सरोदे, त्रिवेणी पाटील, सौ. ज्योती देशमुख, प्रा. शंकर कदम, प्रा. शिवाजी कांबळे, संजय बगाटे, विश्वनाथ झोडपे, रामचंद्र रोडे, डॉ. मुंजाजी इंगोले, एम. एम. बरे, विश्वजित वाघमारे, डॉ. मुनीब हनफी, मुसैब ऊर रहमान, अंसारी जावेद आणि माविया अब्दुल कलाम या कवींनी आपल्या दर्जेदार रचना सादर केल्या.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भास्कर गायकवाड यांनी केले. प्रारंभी महोत्सव समितीचे अध्यक्ष समीर दुधगावकर, डॉ. सुरेश हिवराळे, एन. आय. काळे, अनिता सरोदे, यशवंत मकरंद, प्रा. डॉ. सुरेश शेळके, त्र्यंबक वडसकर, रवी पुराणिक, संजीव आढागले, ॲड. अफजल बेग, रवी पंडित व संजय आडोदे यांनी क्रांतीबा ज्योतीबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विश्वजित वाघमारे, विनय मकरंद, सिद्धांत सूर्यवंशी, आनंद सारणीकर आदींनी परिश्रम घेतले. ११ एप्रिल रोजी समितीच्या वतीने क्रांतीबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.





