महामंडलेश्वर स्वामी शिवगिरिजी महाराज यांचे प्रतिपादन
निफाड येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात भव्य मौन-जपानुष्ठान सोहळा
निफाड जि.नाशिक ( बाबासाहेब हेलसकर) : निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज ( बाबाजी) यांनी श्रमप्रतिष्ठा, भारतीय संस्कृतीची जपणूक आणि संस्कारी मने घडविण्यासाठी आश्रमातून मौन-जपानुष्ठानाची परंपरा सुरू केली. आजही ती अखंडपणे चालू आहे, असे प्रतिपादन भारतातील सर्वात प्राचीन श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष (महाराष्ट्र) श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरिजी महाराज यांनी केले.
श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त निफाड येथील भाऊसाहेब नगर साखर कारखाना परिसरातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात १८ मे २०२६ पासून महामंडलेश्वर स्वामी शिवगिरिजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात भव्य मौन-जपानुष्ठान सोहळा सुरू आहे. याशिवाय ज्ञानेश्वरी वाचक रायते महाराज यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण, स्वामी शिवगिरी महाराज यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथा होत आहे. उपस्थिती मान्यवर महाराज मंडळीचे प्रवचन, आहार प्रवचन, काकडा भजन, हरिपाठ आदी कार्यक्रम होत आहेत.
शुक्रवारी मार्गदर्शन करताना शिवगिरी महाराज यांनी सांगितले की, श्रमांची शेती फुलणार्या संत जनार्दन स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगरासह विविध भागात भगवान महादेवाची उपासना, भक्ती, शिवालये जिर्णोद्धार, उभारणी, अनाथ, गोरगरीबांसाठी गुरूकुल शिक्षण पद्धतीवर भर दिला. भौतिक शिक्षणाला आध्यात्मिक, धार्मिक आणि वैज्ञानिक शिक्षणाची जोड त्यांनी दिली. त्यांचे अनेक कृपा पात्र शिष्य हा वारसा पुढे चालवत आहेत. लाखो भाविक शिवोपासना, साधना, श्रद्धा, भक्ती आणि श्रमसंस्कारांचा अनुभव आजही घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. शिवमहापुराण कथेचे माहात्म्य सांगताना शिवगिरी महाराज म्हणाले की, शिवमहापुराण कथा ही व्यथा, दुःख याचे निवारण करणारी आहे. कथेत सुंदर चिंतन मांडलेले आहे. महादेवाची श्रद्धेने केलेली भक्ती आणि सद्गुरू यांनी सांगितलेली साधना अंगिकारल्यास जीवन सहज सुंदर होते. जसा आहार तसा विचार आणि पाणी तशी वाणी बनत असते. त्यामुळे याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.
भजनी मंडळाच्या साथसंगतीने रंगत
भजनी मंडळाच्या गायन आणि वादनाच्या साथसंगतीने जपानुष्ठान सोहळ्यातील विविध कार्यक्रमांत रंगत भरली आहे. यामध्ये दत्ता महाराज, ईश्वर महाराज, गोपाल महाराज, दीपक महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोमनाथ महाराज आदींसह अनेकांचा समावेश आहे.जपानुष्ठानात विशेषत: मोठ्या संख्येने लहान मुलांसह तरूण, नागरिक आणि महिलाही सहभागी झाल्या आहेत.
सोमवारी सोहळ्याची सांगता
अनेक संत महंतांसह पंचक्रोशीतील भाविकांची विविध कार्यक्रमांना मोठी उपस्थिती आहे. अधिक मासात अनेक भाविक अन्नदान, फलदानासाठी पुढे आले आहेत. यामुळे दररोज मोठी अन्नदान सेवा होत आहे. २२ मेपासून लघुरूद्रयाग यज्ञ सुरू झाला. तसेच महिलांनी पार्थीव ( मातीचे) शिवलिंग तयार करून त्याचे पूजन केले. २३ मे रोजी पुरूषोत्तम पूजन झाले. मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. २५ मेरोजी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता आहे.
साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...
ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान...
सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती...