जालना-परभणी-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी जिंतूर व सेलू तालुक्यात मोठ्या पोलीस बंदोबस्तात भूसंपादन; शेतकऱ्यांचा आक्रोश
बाबासाहेब हेलसकर परभणी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-परभणी-नांदेड द्रुतगती महामार्ग प्रकल्पासाठी सेलू व जिंतूर तालुक्यातील विनासंमती निवाडे झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा घेण्याची कार्यवाही मागील तीन-चार दिवसांपासून सुरू आहे. या मोहिमेसाठी २० अधिकारी, १५० हून अधिक पोलीस आणि सुमारे ४० वाहनांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, आक्रोश, विनंत्या, मागण्या आणि पाणावलेल्या कडांच्या भावना समजून घेत, पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समजूत काढत ही कार्यवाही पार पाडली जात आहे. अखेर काळजावर दगड ठेवून जमिनीचा ताबा दिला जात आहे.
महामार्गासाठी सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. या आदेशानुसार जवळा जिवाजी, चिकलठाणा, रायपूर आणि वालूर या गावांमध्ये सक्तीच्या भूसंपादनाच्या दिवशी संबंधित खातेदारांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. गुरुवारी, १६ जुलै २०२६ रोजी सकाळी गुळखंड, हट्टा आणि तांदुळवाडी येथील जमिनींचा ताबा घेण्यात आला. शुक्रवारी वालूर येथील शेतजमीन शासनाने मोन्टेकार्लो लिमिटेड कंपनीच्या स्वाधीन केली. शनिवारी वालूर, रायपूर आणि चिकलठाणा खुर्द येथील ताबा घेण्यात आला. तर रविवारी, १९ जुलै रोजी चिकलठाणा खुर्द आणि चिकलठाणा बुद्रुक येथे ही कार्यवाही सुरू होती. याच पद्धतीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात जवळा जिवाजी शिवारातील जमिनीवर दुपारनंतर ताबा घेतला जाणार आहे.
▫️तीव्र विरोध, अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
या कार्यवाहीदरम्यान ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु तहसीलदार डॉ. शिवाजी मगर (सेलू), तहसीलदार शीतल कच्छवे (जिंतूर ) नायब तहसीलदार विजय मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे, अनिल विभूते, पोलीस निरीक्षक अरुण नागरे आणि मंडळ अधिकारी सारिका हेगडे प्रतिभा खाकरे, वैजनाथ आमदरे, तलाठी ओम कानडे, दीपक गांगुर्डे, गोडबोले किरण चव्हाण आदींनी शेतकऱ्यांना समजावले. तुमचा मोबदला न्यायालयात जमा केला असून तो कधीही काढता येईल, परंतु शासकीय प्रक्रियेत अडथळा आणू नका, अशी भूमिका प्रशासनाने घेतली.
▫️शेतकऱ्यांना अश्रू अनावर
जिंतूर तालुक्यातील मारवाडी परिसरात शेतकरी रामकिसन भाबट, गणेश देशमुख आणि दीपक देशमुख यांनी झाडांची योग्य नोंद करून दुरुस्ती मोबदला देण्याची मागणी केली. मात्र, तहसीलदार शीतल कच्छवे आणि पथकाने प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत त्यांची समजूत काढली. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने आंबा, इतर झाडे आणि हळदीचे उभे पीक काढण्यात आले. जिवापाड जपलेली झाडे स्वतःच्या डोळ्यांसमोर उन्मळून पडताना पाहून शेतकरी रामकिसन भाबट यांना अश्रू अनावर झाले. वालूर येथील ८० वर्षांच्या गिरजाबाई साहेबराव मुंढे या वृद्ध महिलेने बागायती जमिनीला कमी भाव मिळत असल्याने टाहो फोडला. मागील चार दिवसांपासून सेलू तालुक्यातील बाधित शेतशिवारातअशा अनेक भावनिक प्रसंगात शेतकरी अश्रूंना गिळून ताबा देत असल्याचे चित्र आहे.
▫️आंदोलन, उपोषणाचा आवाज दाबला
दरम्यान, महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाला सुरुवातीपासूनच सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध राहिलेला आहे. योग्य मोबदला न मिळणे, बागायती जमिनी जिरायती दाखवणे आणि झाडे, विहिरींची योग्य नोंद न होणे याविरोधात शेतकऱ्यांनी वेळोवेळी रास्ता रोको, धरणे आणि सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ६७ दिवस साखळी उपोषण करून आपली न्याय मागणी मांडली. परंतु याकडे दुर्लक्ष करीत आवाज दाबण्यात आला, असा आरोप बाधित शेतकरी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयाची पायरी चढली असून लवादामार्फत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मात्र, हा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाच प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात मोहीम राबवून जमिनी ताब्यात घेतल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
बागायती जमिनीला कोरडवाहू दाखवून घर, विहीर, आखाडा सगळंच उद्ध्वस्त केले. मधोमध महामार्ग गेल्याने २४ एकर शेतजमीन दोन तुकड्यात विभागली गेली. उर्वरित शेतात जायला रस्ताही उरलेला नाही, असे रायपूर येथील बाधित शेतकरी रामेश्वर गाडेकर यांनी सांगितले.
▫️आम्ही काय आतंकवादी आहोत का ?
चिकलठाणा येथील बाधित शेतकरी प्रशांत नाईक व अन्य शेतकऱ्यांनी रविवारी कार्यवाही दरम्यान, आम्ही केव्हाही सहकार्य करायला तयार आहोत. पण हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यावर अन्याय करण्याचे काम शासन करत आहे. लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तरी कार्यवाही व्हावी, अशी ठाम भूमिका तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांच्यासमोर मांडली. तर पोलिसांचा मोठा लवाजमा पाहून आम्ही काय आतंकवादी आहोत का ? असा संतप्त प्रश्न शेतकरी उपस्थित करीत होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...