जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे : लोकशाहीत माध्यमांची सजगता महत्वपूर्ण
उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा परभणीत सन्मान
निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील पत्रकारांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. ( छायाचित्र : उत्तम बोरसुरीकर)
परभणी : पत्रकारांच्या लेखणीद्वारेच प्रशासन आणि समाजातील चुका निदर्शनास येतात. प्रशासन व सामान्य नागरिक यांच्यात संवाद घडतो. पारदर्शकता, जबाबदारी आणि समाजप्रबोधनाची भूमिका पत्रकार पार पाडत असतात. त्यामुळे माध्यमे नेहमीच सजग असतात. पत्रकारांचा सन्मान म्हणजेच समाजाच्या सजगतेचा सन्मान आहे. लोकशाहीत माध्यमांची सजगता महत्वपूर्ण ठरते, असे मत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी व्यक्त केले.
निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा शुक्रवारी, १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी श्री गावडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी देवेंद्र सिंह, प्रा.दीपक रंगारी, नायब तहसीलदार सतीश रेड्डी उपस्थित होते.
श्री.गावडे म्हणाले, ” लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून सर्व माध्यमांनी बजावलेल्या जनजागृतीच्या भूमिकेमुळेच मतदानाचा टक्का वाढला आहे.” अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी, बदलत्या निवडणूक प्रक्रियेसोबतच, निवडणुकीत झालेले बदल, बदलणारे प्रवाह यासह पत्रकारांच्या भूमिकेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “लोकशाही शासन व्यवस्थेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि ती भूमिका माध्यमे अतिशय तटस्थपणे पार पाडतात. माध्यमेच भारतीय निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण करू शकली.”
या वेळी माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळेत जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी पत्रकारांसाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजना, उपक्रमांची माहिती दिली. देवेंद्र सिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान आणि पत्रकारिता, तसेचज्ञशिक्षक दीपक रंगारी यांनी वृत्तसंकलन – संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रभू दीपके, सुरेश नाईकवाडे आदींसह पत्रकारांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करीत प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आभार मानले. सूत्रसंचालन श्री.विधाते यांनी केले, तर श्री.धोंगडे यांनी आभार मानले.





