सेलूमध्ये फिरता ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यास प्रारंभ
स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या अमृतवाणीत भाविक दंग
सेलू जि.परभणी : सेलू येथील अलंकापुरीनगरीत गुरुवारपासून (१२ मार्च) फिरता ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्याला अभूतपूर्व उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्ताने आयोजित राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या महाभारत संदेश कथा श्रवणाला पहिल्याच दिवशी भाविकांनी अलोट गर्दी केली.
प्रारंभी कथेचे यजमान बिहाणी परिवाराच्या वतीने संत, सद्गुरू आणि ग्रंथ पूजन झाले. यावेळी सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी, जयप्रकाश बिहाणी, किरण बिहाणी, नामदेव महाराज ढवळे, रामनाना पाटील, माधुरी पाटील, नारायण मुसळे, गजानन आघाव, डॉ. आशिष डख, अशोक पटवारी, कचरू शेरे, ओमप्रकाश मेहता, पारस काला यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वामीजी म्हणाले की, महाभारत हा केवळ ग्रंथ नसून तो मानवी संस्कृतीचा महान ज्ञानकोश आहे. भगवान वेदव्यासांच्या वचनानुसार, जो आपल्या घरात हा ग्रंथ आदराने ठेवेल, त्याला सर्वत्र यश प्राप्त होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांनी बालपणी यातील कथा ऐकल्या होत्या, ज्याचा त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला. जगातील प्रत्येक समस्येचे उत्तर गीतेमध्ये दडलेले असून मनातील संभ्रम, भीती आणि दुःख यावर मात करण्यासाठी गीता ही प्रत्यक्ष जगण्यासाठी आहे.
भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचे कारण सांगताना त्यांनी संस्कृतीचे १६ स्तंभ विशद केले. यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे ४ पुरुषार्थ; ४ आश्रम; ४ वर्ण आणि ४ साधना मार्गांचा समावेश आहे. प्रास्ताविक पंडित महाराज डाके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले. या सोहळ्याला सेलू शहरासह पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केली आहे.
जीवनात पत्नीचे स्थान श्रेष्ठ
शकुंतला आणि दुष्यंत राजाच्या प्रसंगातून सत्याचा विजय आणि कौटुंबिक जबाबदारीचे महत्त्व विशद करताना राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज म्हणाले की, मानवी जीवनात पत्नीचे स्थान श्रेष्ठ असून ती संसाराचा मुख्य आधारस्तंभ आहे. मानवाचा सर्वात उत्तम मित्र म्हणजे त्याची पत्नीच असते. धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ साध्य करण्यासाठी पत्नीची खंबीर साथ आवश्यक आहे. ती संसाराची नौका असून आजारपणात मातेप्रमाणे सेवा करते.





