अप्पर विभागीय आयुक्त डॉ प्रताप काळे, सेलूत महासमाधान शिबीराचा समारोप
सेलू : सर्व सामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरे राबवली जात आहेत त्याचा लाभ शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, निराधार महिला, अत्पसंख्यांक , मागास प्रवर्ग व ग्रामीण भागातील नागरीकांनी व्हावा त्यासाठी प्रशासन गतिमान केले तर ते लोकाभिमुख होईल असे प्रतिपादन अप्पर विभागीय आयुक्त डॉ प्रताप काळे यांनी केले.
येथील महसूल विभागाच्या वतीने तहसील कार्यालयात आयोजित महासमाधान शिबीराचे उद्घाटन करताना डॉ काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शोभादेवी जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मिलिंद सावंत, सभापती डॉ संजय रोडगे, तहसीलदार डॉ शिवाजी मगर, नायब तहसीलदार विजय मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय हरबडे, नायब तहसीलदार गजानन इनामदार , सौ निर्मला आवटे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ प्रताप काळे व मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना 7/12 , वारसा फेरफार नक्कल, राशन कार्ड, EKYC, ॲग्रीस्टॅक , जातप्रमाण पत्र वाटप करून 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
शेतकऱ्यांना पिकविम्यासह ,शेत रस्ते, पाणंद रस्ते, घरकुल , सिंचन विहीरी , सोलार पंप अशा विविध योजनांचा लाभ तात्काळ झाला पाहिजे अशी आग्रही मागणी सभापती डॉ.संजय रोडगे यांनी केली,
तर नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी शहरात पाणी पुनर्वापर प्रक्रीयेसाठी शासनाने 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असे स्पष्ट करून घरकुल योजना राबवण्यात सेलू नगर परिषद परभणी जिल्हयात प्रथम क्रमांकावर आहे असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार डॉ शिवाजी मगर सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर मंडळ अधिकारी सारीका हेगडे यांनी आभार मानले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी ग्राम महसूल अधिकारी ओम कानडे, विजय बोधले,प्रदीप पेंडलवार, हरिश टाक, स्वाती राऊत, अर्चना गायकवाड यांच्या सह महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





