शिस्त, पारदर्शकता आणि विकासाचा संकल्प; कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तबद्धता व शेतकरी हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
सेलू : सेलू बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या विकासाचा आखाडा असावी, राजकारणाचा नव्हे. याच भूमिकेतून पदभार स्वीकारल्यापासून पारदर्शकता, शिस्त आणि विकासाच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक असलेले सर्व बदल कठोरपणे राबवत असल्याचे स्पष्ट मत सभापती डॉ.संजय रोडगे यांनी मंगळवारी, ९ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत तसेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. या पत्रकार परिषदेसाठी संचालक ॲड. दत्तराव कदम, श्री. माऊली ताठे श्री. अनिल पवार,श्री. शैलेश तोष्णीवाल, श्री. रामेश्वर राठी, श्री. केशव सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तबद्धता निर्माण करण्यासाठी घेतलेले निर्णय
सभापतीपद स्वीकारताच मार्केट कमिटीतील काही कर्मचाऱ्यांची कामावरील अनास्था आणि शिस्ताअभावी निर्माण झालेली अव्यवस्था यावर लक्ष केंद्रित केल्याचे डॉ.रोडगे यांनी सांगितले.
- कार्यालयामध्ये वेळेवरती हजर राहणे. आल्याबरोबर फिंगर टेक बायोमेट्रिक हजेरी करणे.
- युनिफॉर्म सक्तीने लागू केले.
- कंप्युटर प्राविण्य अनिवार्य केले – खोट्या प्रमाणपत्रांवर प्रमोशन घेतलेल्या प्रकरणांची चौकशी सुरू केली.
- रोज केलेल्या कामाचा अहवाल (Daily Report) कळवणे आवश्यक आहे.
- रोजनिशी लिहिणे बंधनकारक केले.
- रजेचे नियम कठोरपणे लागू केले.
- रोजच्या हालचालीचे रजिस्टर सुरू केले.
- वसूल झालेली रक्कम बँकेत रोज जमा करण्याचे आदेश दिले.
- कोणत्याही संचालकाकडे कर्मचाऱ्यांनी पैसे जवळ न ठेवता बँकेत जमा करावेत.
या सर्व नियमांमुळे काही कर्मचारी विरोध करीत असले तरी ९०% कर्मचारी पूर्ण सहमतीने शिस्तबद्ध पद्धतीने कामाला लागले आहेत. शिस्त लावणे हे मोठे आणि आव्हानात्मक काम असले तरी ते मी दृढनिश्चयाने राबवत आहे, असे डॉ. रोडगे यांनी सांगितले.
शेतकरी हितासाठी केलेली विकासकामे
शेतकऱ्यांना थेट फायदा होईल अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मार्केट यार्ड विकास
- मार्केट यार्डातील जागांची दुरुस्ती करून घेतली.
- त्या ठिकाणी जनावरांचा बाजार सुरु केला. विरोध करणाऱ्यांनी त्या ठिकाणी कधीही भेट न देता केवळ बैठका घेऊन अडथळे निर्माण केल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले.
खरेदी व्यवस्थेत सुधारणा
- सी.सी.आय. (CCI) चे कापूस खरेदी केंद्र सुरू केले.
- कापूस खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी शासनाशी पाठपुरावा केला.
- नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी चालू केली.
- मागील कार्यकाळात ४ वर्ष बंद असलेला काटा (वजन करण्याची सोय) आम्ही सुरू केला.
- शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी मोंढ्यामध्ये बीट सुरू केले.
शेतकरी सुविधा
- कमी दरात चाळणी यंत्र सुरू केले – शेतकऱ्यांना थेट लाभ दिला.
- शेतीनिष्ठ पुरस्कारांचे वितरण केले.
- व्यापारी, हमाल, जिनिंग संचालक यांच्या बैठका घेऊन संवाद वाढवला.
राजकारणाला बाजूला ठेवून फक्त शेतकरीहित
सध्या काही मंडळी तांत्रिक कारणांचा आधार घेऊन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण माझी आणि संपूर्ण टीमची भूमिका स्पष्ट आहे— शेतकऱ्याच्या जात-पात-पक्ष न पाहता सर्वांचा विकास करणे. गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मदत करण्याचीही आमची तयारी असते, आणि हे काम आम्ही सातत्याने करतही आहोत.
सभापती डॉ. संजय रोडगे यांचे स्पष्ट मत : “कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या विकासाची जागा आहे. येथे राजकारणाला स्थान नाही. शिस्त, पारदर्शकता आणि शेतकरीहित या तीन आधारस्तंभावर आम्ही काम करत आहोत. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही. मार्केट कमिटीचा प्रत्येक निर्णय शेतकऱ्याच्या भल्यासाठीच असेल.”





