परभणी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गुरुवारी, २८ ऑगस्ट रोजी तालुक्यातील सात ते आठ गावांचा संपर्क तुटला असून, काही भागांत घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
बनवस गावाला पुराचा वेढा
पावसाचा सर्वाधिक फटका बनवस गावाला बसला आहे. गावाच्या चारही बाजूंनी पाणी साचल्याने बनवसचा संपर्क तुटला आहे. तसेच रामापुर, रामापुर तांडा, गिरधरवाडी, तावजी वाडी, कट्टू नाईक तांडा, पुयणी या गावांचाही तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावातील सखल भागांत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, बनवस येथील भागवत कदम (वय ३०) हा पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता. मात्र, गावातील युवकानी पाण्यात उड्या मारून त्याचे प्राण वाचविले आहेत. पावसामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. प्रशासनाकडून पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्णा-झिरोफाटा रस्ता बंद
पूर्णा ते झिरोफाटा या रस्त्यावरील माटेगावजवळील थूना नदीला पूर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्त्याचा वापर केला जात होता, परंतु या पर्यायी रस्त्यावरही पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.





