डॉ. कमलाकर परळीकर यांचे प्रतिपादन, शास्त्रीय गायन आणि सरोद वादनाने सेलूकर भारावले; लोकसहभागातून संगीत महोत्सवाचा प्रारंभ
सेलू I प्रतिनिधी : स्वातंत्र्यपूर्व काळापासून संगीत आणि सेलूकरांचे अतुट नातं राहिले आहे. मराठवाड्यात शास्त्रीय संगीताचे बिजारोपण करून त्याच्या प्रचार, प्रसार आणि जनमानसात ते रुजवण्यासाठी संगीतरत्न स्वातंत्र्य सैनिक पंडीत हरिभाऊ चारठाणकर यांचे योगदान मोठे आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने मराठवाड्याचे गंधर्व आहेत असे प्रतिपादन सुरमणी डॉ. कमलाकर परळीकर यांनी केले.
सेलू येथील साई नाट्यगृहात शनिवारी १० जानेवारी रोजी लोकसहभागातून आयोजित संगीतरत्न पं. हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे उद्घाटन पार पडले, त्याप्रसंगी डॉ. परळीकर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, गोविंदभाऊ जोशी, डॉ. रामराव रोडगे, यशवंतराव चारठाणकर, महेशराव खारकर, निलेश बिनायके, श्रीकांत उमरीकर, मोहन खापरखुंटीकर आणि बाबासाहेब चारठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महोत्सवाच्या प्रथम सत्रात मराठवाड्याची उदयोन्मुख गायिका सायली टाक यांनी राग मालकंस सादर करून प्रथम पुष्प गुंफले. त्यानंतर मुंबईच्या प्रसिद्ध गायिका सायली तळवलकर यांनी राग मारू बिहाग आणि बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल या अभंग गायनाने रसिक श्रोत्यांना भक्तीरसासोबतच आनंद, प्रेम व विरह रसाची अनुभूती दिली. पुणे येथील नितीन पुरोहित यांच्या सरोदवरील राग हेमंत आणि पलास काफी धून वादनाने रसिकांची मोठी दाद मिळवली. या कलाकारांना शांतीभूषण देशपांडे, जगमित्र लिंगाडे, यश खडके आणि शिवाजीराव पाठक यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नादब्रम्ह संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी सच्चिदानंद डाखोरे यांच्या मार्गदर्शनात नांदी गायन करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. यामध्ये मनवा देशमुख, शरण्या मोहकरे, वैष्णवी बोठे, भक्ती शिंदे, ज्ञानेश्वरी शिंदे, श्रुती बोकन, सानवी शिंदे, आरोही उगले, यथार्थ गवलवाड, प्रज्योत पांचाळ, ध्रुव सुवर्णकार, रेणूका बोठे, ऋतुजा महाजन आणि माही सराफ यांचा समावेश होता. महोत्सवाचे प्रास्ताविक संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले तर गंगाधर कान्हेकर यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चारठाणकर, सुरेखा चारठाणकर, वैशाली चारठाणकर आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...