नूतन विद्यालयाच्या १९८६ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा रंगला

सेलू : काळाच्या ओघात प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या झाल्या, आयुष्याच्या धावपळीत संपर्क कमी झाला आणि पाहता पाहता चार दशके सरली. मात्र बालपणीच्या मैत्रीवर काळालाही मात करता आली नाही. तब्बल ४० वर्षांनंतर नूतन विद्यालय, सेलूच्या १९८६च्या दहावीच्या बॅचचे वर्गमित्र नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य इगतपुरी येथे पुन्हा एकत्र आले आणि चार दशकांपूर्वीची मैत्री जणू पुन्हा नव्याने बहरली.
शनिवारी, ८ ऑगस्ट २०२६ रोजी हिरवाईने नटलेल्या इगतपुरीच्या रम्य वातावरणात रंगलेल्या या स्नेहमीलनाने हास्य, आठवणी आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.वयाची ५३-५४ वर्षे ओलांडलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आयुष्याच्या विविध क्षेत्रांत आपापले स्थान निर्माण केले असले, तरी मित्रांच्या भेटीत मात्र पद, प्रतिष्ठा, जबाबदाऱ्या आणि काळाचे अंतर कुठेच जाणवले नाही. एकमेकांना पाहताच चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि जुन्या मित्रांच्या भेटीने खुललेले हास्य पाहून उपस्थितांना पुन्हा शालेय जीवनातील तेच निरागस दिवस अनुभवता आले.
दीपक बोरकर, संजय भागवत, डॉ. प्रवीण जोग आणि दीपक शर्मा यांच्या विशेष पुढाकारातून या स्नेहमीलनाचे नियोजन करण्यात आले होते. चार दशकांनंतरही मैत्रीचा धागा तुटू नये, या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या भेटीला माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्नेहमीलनाच्या निमित्ताने विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये सहभागी होताना सर्वच मित्र पुन्हा आपल्या शालेय वयात पोहोचल्याचा अनुभव घेत होते. खोडकरपणा, हास्य-विनोद, एकमेकांची फिरकी आणि जुन्या आठवणींची देवाणघेवाण यामुळे इगतपुरीतील वातावरणात उत्साह संचारला.
अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी एकमेकांच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेतल्या. जुन्या मित्रांच्या भेटीतून हरवून गेलेले अनेक धागे पुन्हा जोडले गेले.मनोगताच्या सत्रात मात्र हास्याच्या या वातावरणाला भावनांची किनार लाभली. शालेय जीवनातील गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन, वर्गातील आठवणी, सहली, मित्रांमधील गंमत-जंमत आणि त्या काळातील निरागस जीवन यांना उजाळा देताना अनेकांच्या आठवणी दाटून आल्या. माजी विद्यार्थी उद्धव भुजबळ यांनी व्यक्त केलेले मनोगत विशेष भावस्पर्शी ठरले. जुन्या मित्रांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना ते कमालीचे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू आणि शब्दांतून व्यक्त झालेल्या आठवणींनी उपस्थित मित्रांच्या मनालाही स्पर्श केला. काही क्षण संपूर्ण वातावरण शांत झाले आणि चार दशकांपूर्वीच्या मैत्रीचे भावबंध पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले.
आयुष्याच्या या टप्प्यावर प्रत्येक जण आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतानाही केवळ मैत्रीच्या ओढीने सर्वजण एकत्र आले. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला हा दिवस केवळ स्नेहमेळावा न राहता जुन्या आठवणींचा पुनर्जन्म ठरला. काळ कितीही पुढे गेला, परिस्थिती कितीही बदलली आणि आयुष्याच्या वाटा कितीही वेगळ्या झाल्या, तरी शालेय जीवनात निर्माण झालेले मैत्रीचे बंध मनाच्या एका कोपऱ्यात कायम जिवंत असतात, याची प्रचिती या स्नेहमीलनातून आली.या अविस्मरणीय भेटीनंतर १९८६च्या दहावीच्या बॅचमधील सर्व वर्गमित्र तसेच तत्कालीन शिक्षकांना सहभागी करून सेलू येथे मोठ्या स्वरूपात स्नेहमेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दशकांपूर्वी सुरू झालेल्या मैत्रीच्या या प्रवासाला नव्या आठवणींची जोड देत पुन्हा एकदा सर्व मित्रांनी एकत्र येण्याचा निर्धार केला. त्यामुळे इगतपुरीतील हे स्नेहमीलन केवळ भूतकाळाच्या आठवणींना उजाळा देणारे ठरले नाही, तर पुढील काळातील मैत्री अधिक दृढ करण्याची नवी सुरुवातही ठरली.
प्रारंभी दिवंगत वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या स्नेहमेळाव्यात राजेश देशपांडे, अविनाश देसाई (मुंबई), ॲड.विवेक काला, मनिष कुलकर्णी, महेश कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर ), संजय भागवत, सोमनाथ टाके (पुणे), दीपक बोरकर (नाशिक), दीपक शर्मा (मंचर) कैलास हेडा (नांदेड), सतीश सदावर्ते (परभणी), सेलूतील आनंद बाहेती, डॉ. प्रवीण जोग, मोहन खापरखुंटीकर, अभय सुभेदार, विजय परभणीकर, उद्धव भुजबळ, कैलास मलवडे, बाबासाहेब हेलसकर, प्रवीण माणकेश्वर, डॉ. बाबासाहेब थोरे, विकास गादेवार, सोमशंकर कांदळे, रमेश शेरे आदींनी सहभाग घेतला. परम जैन यांनी सूत्रसंचालन केले.




