पेडगावच्या वीज उपकेंद्रात ऊर्जा रोहित्राचे लोकार्पण
परभणी : शेतकरी, घरगुती ग्राहक आणि उद्योजकांना २४ तास योग्य दाबाने वीज पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असून, शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ तर नागरिकांनी ‘प्रधानमंत्री सूर्य घर योजने’चा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा २.० अंतर्गत, महावितरणच्या पेडगाव येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्रात नव्याने बसवलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्र आणि क्षमता वाढवलेल्या ऊर्जा रोहित्राचे लोकार्पण रविवारी, ३ ऑगस्ट रोजी पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी मंत्री सुरेश वरपूडकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. के. टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता एम. पी. वग्यानी, जी. के. गाडेकर, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, उप कार्यकारी अभियंता डी. व्ही. गव्हाणे, सहायक अभियंता नागेश डुकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बोर्डीकर पुढे म्हणाल्या, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सबस्टेशन्स सौर ऊर्जेवर आणली जात आहेत. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत ९० टक्के आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी ९५ टक्के सबसिडी दिली जात आहे. या उपाययोजनांमुळे डीपी जळणे आणि लोडशेडिंगचे प्रमाण कमी झाले आहे. आगामी ५० वर्षांसाठी विजेची कोणतीही समस्या उद्भवणार नाही, अशा पद्धतीने विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून परभणी तालुक्यातील जांब आणि सिंगणापूर येथील उपकेंद्रांची कामे लवकरच पूर्ण होतील. या नव्या रोहित्रांमुळे पेडगाव उपकेंद्राची क्षमता १० एमव्हीए वरून १५ एमव्हीए झाली आहे. याचा लाभ १७ गावांतील ६,३४० ग्राहकांना मिळणार असून, त्यांना चांगल्या दर्जाचा आणि अखंडित वीजपुरवठा मिळेल.





