लोकांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवा, सेलूमध्ये श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठानची निवेदनाद्वारे मागणी, आंदोलनाचाही इशारा
सेलू : येथील बाजारपेठेत आंबे व इतर फळे कॅल्शियम कार्बाइड तसेच इतर घातक रसायनांचा वापर करून पिकवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून लोकांच्या जिवाबरोबर चाललेला हा खेळ तात्काळ थांबवावा, अशी मागणी श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सेलूचे उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांच्याकडे ३ जून रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात प्रतिष्ठानने म्हटले आहे की, रासायनिक पद्धतीने पिकवलेली ही फळे खाल्ल्याने नागरिकांना तोंडात येणे, उलट्या होणे, जुलाब होणे आणि पोट दुखणे अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. इतकेच नव्हे तर यामुळे कॅन्सरसारख्या अत्यंत गंभीर आजारांचा धोकाही निर्माण झाला आहे. व्यापारी लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळत आहेत. भारतीय अन्न व औषध प्रशासनाच्या मानकांचा विचार केला तर कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून फळे पिकवण्यावर पूर्णपणे बंदी असून हा एक गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही शहरात सर्रासपणे या केमिकलचा वापर केला जात आहे.या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हा चाललेला खेळ न थांबल्यास श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. हे निवेदन देतेवेळी जयसिंग शेळके, अनुप कान्हेकर, विनोद धापसे, गणेश शेवाळे, रवि लांडगे, संदीप पाजगे आणि सागर गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





