प्रा.हनुमान व्हरगुळे यांचे प्रतिपादन, रायपूर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त ‘जागर प्रबोधनाचा’; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सेलू : आज समाज चारित्र्याच्या नुसत्या गप्पा मारतो, मात्र खरंच आज तो चारित्र्यवान राहिला आहे का, याचे समाजातील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत प्रा. हनुमान व्हरगुळे यांनी व्यक्त केले. रायपूर येथे ‘जागर प्रबोधनाचा’ व्याख्यानमाले अंतर्गत राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निसर्ग लेखक माणिक पुरी, वन्यजीव छायाचित्रकार विजय ढाकणे, सरपंच आश्रोबा हिंगे, बापूराव गाडेकर आणि प्रा. ए. टी. मदने उपस्थित होते.पुढे बोलताना प्रा. व्हरगुळे म्हणाले की, पूर्वी महिलांच्या मागे पुरुष खंबीरपणे उभे राहत, तेव्हा महिला आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवत राज्यकारभार चालवायच्या. आज परिस्थिती बदलली असून महिला सबलीकरणाच्या केवळ पोकळ गप्पा मारल्या जात आहेत. महिला सुधारल्या तर समाज सुधारू शकतो याची अनेक उदाहरणे इतिहासात पाहायला मिळतात. मात्र त्या प्रमाणात आज महिलांची अवस्था काय आहे, याचा विचार व्हायला हवा. महिला सक्षम आहेत पण समाज म्हणून आपण ते स्वीकारतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समाज सुधारायचा असेल तर महिला सुधारल्या पाहिजेत ही सर्वांची भावना असते, पण आपल्या घरातील महिलांना आपण किती सन्मान देतो हे अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. चारित्र्य हे स्त्री आणि पुरुष दोघांनाही असते आणि दोघांनीही ते सांभाळले पाहिजे याविषयी राजमाता अहिल्याबाई होळकर अत्यंत जागरूक होत्या. कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असून शिक्षण हे वाचनाचा पाया आहे, असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात माणिक पुरी यांनी आपल्या बोलीभाषेतील कविता सादर करून उपस्थित महिलांची मने जिंकली. या सोहळ्याचे औचित्य साधून १० वी व १२ वीच्या परीक्षेत विशेष प्रविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण गाडेकर यांनी केले तर प्रास्ताविक दादासाहेब गाडेकर यांनी मांडले. उपस्थितांचे आभार प्रदर्शन माधव गव्हाणे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाभाऊ हिंगे, पांडुरंग तात्या गाडेकर, बाबासाहेब गाडेकर, आप्पासाहेब गाडेकर, नामदेव ठोक, माणिक हिंगे आणि शेषेराव हिंगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“माणसाचे चारित्र्य असे असावे की वाहून जाईल ते गंगाजल आणि राहील ते तीर्थजल असले पाहिजे. दरबारचा वेळ महत्त्वाचा आहे हे जाणून इथे येणाऱ्यांनी निष्कारण वेळ वाया घालवू नये.”— राजमाता अहिल्याबाई होळकर





