नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे आवाहन, अक्षर साहित्य संमेलनाचे सेलूत उद्घाटन

सेलू जि.परभणी : साहित्यकार शब्द आणि संवादातून जगण्याचे सत्य व्यक्त करतो आणि नाटक-चित्रपटांच्या माध्यमातून साहित्य जागतिक पटलावर पोहोचते. “वाचनालयांनी आमची बालपणं घडवली” असे सांगून त्यांनी साहित्यकलेच्या विकासासाठी वाचनसंस्कृती टिकवण्याचे आवाहन प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले.सेलू येथील अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी आयोजित अक्षर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी रंगाचार्य गुरुजी मंचावरून ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ.आसाराम लोमटे, माया लोमटे, प्रकाश होळकर, मार्तंड कुलकर्णी, श्रीधर नांदेडकर, राजेश गायकवाड, कौतिकराव ठालेपाटील, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सर्जेराव लहाने, डॉ.संजय रोडगे, डॉ.एस. एम. लोया, जयप्रकाश बिहाणी, डॉ.शरद कुलकर्णी, विलास संदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत कुलकर्णी पुढे म्हणाले की, बालपणी पुस्तके विकत घेणे शक्य नव्हते, त्यामुळे वाचनालय हेच ज्ञानाचे दार होते. आज खर्च कुठे करतो हे पाहणे आवश्यक आहे. दूरदर्शनवर साहित्य प्रदर्शित व्हावे, प्रत्येकाने वाचनालयात जाऊन पुस्तके वाचावीत, मध्यमवर्गाने साहित्य खरेदीत सहभाग घ्यावा, त्यामुळे साहित्यसंस्कृती टिकून राहील. वर्तमानपत्रे दृष्टिकोन निर्माण करणारी असून तरुण पिढीत वाचनाची सवय घटत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मराठी शाळा बंद होत असल्याचे नमूद करून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी मांडली. मातृभाषेत शिक्षण झाले तर जीवन जगणे सुलभ होते; इंग्रजी ही फक्त भाषा असून ज्ञानाची भाषा मराठी आहे, असे ते म्हणाले.
▫️साहित्यातून अमृत निर्माण होते : डॉ.आसाराम लोमटे
अध्यक्षीय समारोपात आसाराम लोमटे म्हणाले की, ज्यांना बोलायचे-लिहायचे ते गप्प का आहेत? समाजातील सर्व प्रश्नांवर लिहिणे गरजेचे आहे. साहित्यातून अमृत निर्माण होते आणि अक्षरांची शेती ही अतिशय महत्त्वाची साधना आहे. शेतकरी जसे बीज जपतो तसे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्रकाश होळकर, प्राचार्य कौतीकराव ठालेपाटील, राजेश गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि रंगाचार्य गुरुजी यांच्या प्रतिमापूजनाने झाली. सच्चीतानंद डाखोरे, पूजा तोडकर आणि विद्यार्थी संचाने महाराष्ट्र गीत सादर केले. प्रास्ताविक विनायकराव कोठेकर, स्वागत सर्जेराव लहाने, सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले तर आभार डॉ. शरद कुलकर्णी यांनी मानले.
▫️’अक्षरायण’ चे प्रकाशन
या संमेलनाची ‘अक्षरायण’ स्मरणिका पालखीद्वारे मंचावर आणून मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. प्रा.अशोक पाठक यांचे उजेडाला पंख फुटले, रमेश बोराडे यांचे चक्रव्यूह, तसेच प्रा. हनुमान मुरगुळे, प्रा. अनंत काटकर, शेख मजहर यांचे दिवाळी अंक यांचे प्रकाशनही यावेळी झाले. जिल्ह्यातील साहित्य–कला क्षेत्रातील मान्यवर, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






