हेलस सानेगुरुजी कथामालेचा उपक्रम; मानवतच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेत उत्साहात पार पडली विभागीय स्पर्धा

मानवत जि.परभणी : अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाउंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी मानवत तालुक्यातील रुढी पाटी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयात शनिवारी, १० जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडली.बाल गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी येथील साक्षी कृष्णा राठोड हिने, तर किशोर गटात संस्कृती विष्णू आरसुळे (नरहर कुरूंदकर माध्यमिक विद्यालय, कुरुंदा जि.हिंगोली) हिने प्रथम क्रमांक पटकावला.
कै.दत्तात्रय हेलसकर यांनी हेलस शाखेच्या वतीने विविध संस्कारक्षम उपक्रम सुरू केले. यापैकी पूज्य साने गुरुजींचे प्रेरणादायी विचार कथाकथनाच्या माध्यमातून मुलांवर सुसंस्कार व्हावेत, या उद्देशाने मराठवाडा विभागीय कथाकथन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.के.एम.महाविद्यालय मानवत येथील सेवानिवृत्त प्राध्यापक भगवान टेकाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव येथील ज्येष्ठ नाटककार ज्योतिराम भोसले, जिजाऊ ज्ञानतीर्थचे संस्थापक अध्यक्ष रामराव लोहट, सचिव प्राचार्य नितीन लोहट, मुख्याध्यापक राम तळेकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सानेगुरुजी, राजामाता जिजाऊ आणि दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, कथाकथनातून संस्काराचे सिंचन होते, सभाधीटपणा, आत्मविश्वास वाढतो, ज्ञानात भर पडते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रास्ताविक संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी केले. विजय वायाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. परीक्षक म्हणून प्रा.गजानन पोले, ग्रंथपाल महादेव आगजाळ आणि प्रणिता केरे यांनी काम पाहिले.
मानस फाउंडेशनचे डॉ.प्रकाश आंबेकर व डॉ.सुहास सदाव्रते यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश कुलकर्णी, विजय वायाळ, प्रमोद देशमुख, बाबासाहेब हेलसकर, व्यंकटेश चौधरी, बाळू बुधवंत, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, सदाशिव महाजन, मंताजी ढाकरे, जिजाऊ ज्ञानतीर्थचे राम तळेकर, सिद्धेश्वर जाधव, दिगंबर गडगिळे, राजू वाघ, अर्जुन भिसे, सुनील काळे, संघमित्रा गायकवाड यांच्यासह जिल्हा संयोजक, शिक्षक व कथामाला कार्यकर्त्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
अंतिम फेरी स्पर्धेचा निकाल असा…विभागीय कथाकथन स्पर्धेच्या अंतिम फेरीत बाल आणि किशोर अशा दोन गटांत चुरस पाहायला मिळाली. बाल गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी येथील साक्षी कृष्णा राठोड हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक संचिता सुभाषराव आष्टेकर (महात्मा फुले हायस्कूल, नांदेड), तृतीय क्रमांक गौरव गजानन देवरे (जिपप्राशा थोरवा, जि.हिंगोली) यांनी मिळवला, तर अक्षरा गजानन पवार (नूतन कन्या प्रशाला, सेलू) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.किशोर गटात संस्कृती विष्णू आरसुळे (नरहर कुरूंदकर माध्यमिक विद्यालय, कुरुंदा जि.हिंगोली) हिने प्रथम क्रमांक मिळवला. प्रज्ञा दिगंबर काकडे (नूतन कन्या प्रशाला, सेलू) हिने द्वितीय, अभितोष मुकुंदराज जोशी (विवेकानंद माध्यमिक विद्यालय, परतूर) याने तृतीय क्रमांक पटकावला. स्नेहा संजीव सूर्यवंशी (जिजामाता कन्या प्रशाला, लातूर) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच अमृता डोंगरे, श्वेता वीर यांचाही सत्कार करण्यात आला
___________
सानेगुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाऊंडेशन जालना यांच्या वतीने आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धा मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयात पार पडली. विजेत्या स्पर्धकांसमवेत मान्यवर. ( छायाचित्र : सदाशिव महाजन)




