अध्यक्षपदी डॉ.आसाराम लोमटे; भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन, जय्यत तयारी सुरू
सेलू : शहरात मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने अक्षर प्रतिष्ठान, सेलू आयोजित जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन रविवार, १६ नोव्हेंबर रोजी सेलूत होणार आहे.सेलू तालुक्यातील गुगळी धामणगावचे भूमिपुत्र आणि ‘इडा पिडा टळो’, ‘अलोक’, ‘वाळसरा’ (कथासंग्रह), ‘धूळपेर’ (ललित), ‘तसनस’ (कादंबरी) यांसारख्या साहित्याचे लेखक, तसेच राज्य वाङमय पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांची जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे.
संमेलनाची जय्यत तयारी सुरू
संमेलनाची तयारी सुरू असून कार्यकारिणी साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब. गिल्डा सभागृहात डॉ. एस.एम. लोया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पहिले अक्षर साहित्य संमेलनाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संयोजन समितीच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, कार्याध्यक्षपदी राम निकम, स्वागताध्यक्ष सर्जेराव लहाने, सरचिटणीस प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांची निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून जयप्रकाश बिहाणी, महेश खारकर, करूणा बागले, निशा पाटील, तर कोषाध्यक्षपदी डॉ. सतीश मगर, एकनाथ जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सचिव म्हणून डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर आणि समन्वयक म्हणून डॉ. काशिनाथ पल्लेवाड, अजित मंडलिक यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ललिता गिल्डा, संतोष कुलकर्णी, डॉ. राजाराम झोडगे, भालचंद्र गांजापुरकर, शशिकांत देशपांडे, प्रा. संजय पिंपळगावकर, बाळू बुधवंत, डॉ. जयश्री सोन्नेकर, सुरेखा आगळे, कीर्ती राऊत, रवी मुळावेकर, रवी कुलकर्णी, संजय विटेकर, रामराव गायकवाड आणि विविध समित्यांमधील सदस्य संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
साहित्य रसिकांसाठी कार्यक्रमांची मेजवानी
मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने अक्षर प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महिला मंडळ आयोजित ‘संतवाणी’ कार्यक्रम होणार आहे. संमेलनाच्या मुख्य दिवशी, म्हणजेच रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडी निघणार आहे. संमेलनात परिसंवाद, निमंत्रितांचे कवी संमेलन, कथाकथन, बालकट्टा, परभणीचे अंतरंग कवी कट्टा आणि गझल मुशायरा यांसारखे विविध कार्यक्रम असणार आहेत.या जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनास महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य असलेले प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर (लासलगाव) आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मार्तंड कुलकर्णी (किनवट) यांची विशेष उपस्थिती असणार आहे.





