सायंकाळी उशिरापर्यंत आक्षेपावर सुनावणी
सेलू | प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आगामी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रात्री साडे आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जिल्हा परिषदेच्या पाच गटातील निवडणुकीसाठी ३१, तर पंचायत समितीच्या १० गणातील निवडणुकीसाठी ६६ असे एकूण ९७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, वैध-अवैध उमेदवारांची यादी निवडणूक विभागाकडून प्रसिद्धी माध्यमांना रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.
आकडेवारीवरून सेलू तालुक्यातील विविध मतदारसंघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद गटांच्या स्थितीनुसार, चिकलठाणा (बु.), वालूर, कुपटा, रवळगाव आणि देऊळगाव गात या पाच गटांमध्ये एकूण ३१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये १२ पुरूष आणि १९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. चिकलठाणा गटात ६, वालूरमध्ये ५, कुपटा येथे ९, रवळगावमध्ये ४ आणि देऊळगाव गात गटामध्ये ७ वैध उमेदवारांची नोंद करण्यात आली आहे.
दुसरीकडे, पंचायत समितीच्या १० गणांमध्ये देखील उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. चिकलठाणा, रवळगाव, मोरेगाव, बोरकिनी, वालूर, कुपटा, सोन्ना, डासाळा, देऊळगाव गात आणि तिडी पिंपळगाव या गणांमध्ये मिळून एकूण ६६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये ३६ पुरुष आणि ३० महिला उमेदवारांनी निवडणूक रिंगणात आपले स्थान निश्चित केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ जानेवारी २०२६ आणि याच दिवशी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शिवाजी मगर यांनी कळविली आहे.





