श्रीराम प्रतिष्ठानचा सुरभी महोत्सव
सेलू : श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने साहित्याची मोठी पर्वणीसेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य कवी संमेलन उत्साहात पार पडले. संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्यात राज्याच्या विविध भागांतून ११४ कवींनी सहभाग नोंदवून शब्दांचा महोत्सव साजरा केला. साहित्यिक अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नवोदित कवींना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या कार्यक्रमाला डॉ. संजय रोडगे यांच्यासह सचिव डॉ. सविता रोडगे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, डॉ. रामराव रोडगे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनात प्रेम, सामाजिक वास्तव, शेतकरी प्रश्न आणि मानवी संवेदना अशा विविध विषयांवरील कवितांचे सादरीकरण करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय रोडगे म्हणाले की, साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असून कवी हा समाजाचा जागता पहारेकरी आहे. ग्रामीण भागातील प्रतिभेला व्यासपीठ मिळावे यासाठी प्रतिष्ठान सदैव कार्यरत राहील. ११४ कवींच्या उपस्थितीने हा सोहळा सेलूच्या साहित्यिक इतिहासात मैलाचा दगड ठरला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरतकुमार लाड, प्रा. महादेव साबळे यांच्यासह प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





