हभप अच्युत महाराज दस्तापूरकर : परभणी येथील पंचमुखी हनुमान मंदिरात बैठक संपन्न
परभणी : सेलू येथे पंडित महाराज डाके यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या फिरत्या ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यासाठी सर्व प्रकारची मदत करू, असे वचन अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी शनिवारी (दि.७) एका बैठकीत बोलताना दिले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने मागच्या पाच वर्षापासून पंडित महाराज डाके परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी अखंड फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करत आहेत. या पारायण सोहळ्याची सेलू तालुक्यातील सांगता दि.११ ते १९ मार्च या दरम्यान सातोना रोड सेलू येथे होणार आहे. या भव्य पारायण सोहळ्याच्या सूक्ष्म नियोजनाच्या संदर्भात शनिवारी (दि.७) पंडित महाराज डाके हे परभणी शहरात आले होते. त्यानिमित्त पंचमुखी हनुमान मंदिर, गव्हाणे चौक परभणी येथे झालेल्या बैठकीस अच्युत महाराज दस्तापूरकर, माधवबुवा आजेगावकर, वेदशास्त्र संपन्न बाळू गुरु आसोलेकर, सूर्यकांत पागोटे महाराज, नरहरी गुरु जोशी एरंडेश्वरकर, पंडीत महाराज डाके यांची प्रमुख उपस्थिती होती.अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. स्वामी विवेकानंद तसेच शीख धर्मातील परंपरेचे उदाहरण देत ग्रंथ हेच गुरु असल्याचे स्पष्ट केले. पंडित महाराज डाके यांनी आजवर २०० गावांमध्ये श्री ज्ञानेश्वरी पारायणे केली असून त्यांच्या रूपाने वारकरी संप्रदायाला नवं नेतृत्व मिळाल्याची भावनादेखील त्यांनी व्यक्त केली. हभप डाके महाराज यांनी फिरता पारायण सोहळा ही श्री ज्ञानेश्वरी ग्रंथासाठी केलेली उपासना असून यासाठी सर्वच जण कष्ट घेतात असे सांगितले. शेतकरी पूत्र गावोगावी जाऊन प्रचारक बनून लोकांना या उपक्रमात सहभागी होण्यास सांगतात. लोकसहभागातून ही एक प्रकारची धार्मिक चळवळ बनत आहे. प्लास्टिक न वापरता स्टीलच्या वाट्या व पेले आणि केळीच्या पानांचा महाप्रसादासाठी वापर केला जातो. हे काम अच्युत महाराजांनी पुढे न्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली.यावेळी आजेगावकर, जोशी महाराज, आसोलेकर, पागोटे महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक ॲड.रमेशराव दुधाटे गोळेगावकर यांनी केले. वारकरी संप्रदायात परभणी जिल्ह्याचे मोठे योगदान असून गावागावातून संत परंपरेचा वारसा आजही जपला जात आहे. आज तरुणाई वाचनापासून, संत संगतीपासून दूर गेल्याने आज समाजाला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अशा स्थितीत पंडित महाराज डाके यांनी सुरू केलेला फिरता पारायण सोहळा हा एक चांगला उपक्रम असून तो टप्प्याटप्प्याने मराठवाडा व महाराष्ट्रात नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सूत्रसंचालन डॉ.शेखर देशमुख यांनी केले. शशीकला बंडे यांनी सादर केलेल्या पसायदानाने बैठकीची सांगता झाली. यावेळी रमेश महाराज मोरे, रामप्रसाद महाराज चव्हाण, ओम महाराज आगे, डॉ.केदार खटिंग, डॉ.रामेश्वर नाईक, राजेंद्र पोकर्णा, ॲड.न. चिं.जाधव, स्वप्नील पत्तेवार,नंदकिशोर डोंबे, राजाभाऊ मुंडे, अनिल देशमुख, ॲड.दीपकराव देशमुख, प्रा.डॉ. चिताडे, ॲड.राजकुमार भांबरे आदी उपस्थित होते.





