सेलू : शिक्षक दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलताना शालेय समितीच्या अध्यक्षा करुणा कुलकर्णी यांनी, विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा आहेत, असे प्रतिपादन केले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक हे दुसऱ्या पालकांप्रमाणे असतात आणि समाज व देश घडवणाऱ्या पिढीच्या निर्मितीमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
शिक्षक किती प्रभावीपणे शिकवतात आणि यशस्वी होतात, याची खरी पावती विद्यार्थ्यांच्या प्रगतीतून मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशातून शिक्षकांचे यश प्रतिबिंबित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर, मुख्याध्यापक शंकर शितोळे, अनिल कौसडीकर आणि शंकर राऊत उपस्थित होते. यावेळी, विद्यालयाच्या वतीने सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही भाषणांतून शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, मानस सरोवर यात्रा पूर्ण करून परत आलेल्या बालवाडीच्या शिक्षिका सीमा आष्टीकर यांचाही खास सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर यांनी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनाची गुणवत्ता वाढवावी, असे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, शिक्षक हे प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे ऊर्जास्रोत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि राष्ट्र उभारणीचा पायाही शिक्षकच तयार करतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गायकवाड यांनी केले, तर पद्य गजानन साळवे यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजय चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.





