बंडा तात्या कराडकर महाराज : सेलू येथे फिरता ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यात भाविकांची रीघ
सेलू : वारकरी संप्रदाय हा निष्कामतेच्या पायावर उभा आहे. जिथे निष्कामता असते, तिथेच खरे ऐश्वर्य निर्माण होते. आज समाजात विवेकाची जागा विकाराने आणि वैराग्याची जागा वैभवाने घेतली आहे, अशा काळात निष्काम भावनेने केलेली लोकसेवाच शाश्वत टिकते, असे प्रतिपादन संतवीर श्रीगुरु बंडा तात्या कराडकर यांनी केले.
सेलू शहरातील अलंकापुरीनगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या ‘काय उणे आम्हा विठोबाचे पाय’ या अभंगावर निरूपण केले.
बंडा तात्या पुढे म्हणाले की, जगात सुखाबद्दल सर्वांचे एकमत आहे, पण सुख शोधण्याची जागा चुकली आहे. माणसे बाहेर सुख शोधत आहेत, पण सुख आपल्याच पाशी आहे. देवाकडे ऐश्वर्य, सत्ता आणि औदार्य हे तीनही गुण आहेत. जो विठ्ठलाच्या चरणी अनन्यभावाने शरण जातो, त्याला कशाचीही उणीव भासत नाही. आजच्या काळात मोबाईल हा वेळ खाणारा राक्षस बनला असून, तरुणांनी यापासून सावध राहण्याची गरज आहे.
या सोहळ्याचे नियोजन करणाऱ्या पंडित महाराज यांच्या कार्याचे तात्यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, समाजाने गुणांच्या पाठीमागे उभे राहावे. गेल्या पाच वर्षांपासून ज्ञानेश्वरीचा प्रचार घराघरात करणाऱ्या या उपक्रमाला समाजाची मिळालेली साथ ही निष्कामतेची पावती आहे. यावेळी त्यांनी आगामी काळात ज्येष्ठ कीर्तनकारांच्या तारखा मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.
कार्यक्रमाला भाविकांची अलोट गर्दी होती. याप्रसंगी स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांनी महाजांचा सत्कार केला. कीर्तनानंतर आरती होऊन सोहळ्याची सांगता झाली.
बंडा तात्या कराडकर म्हणाले…
जगात कोणत्याही विषयावर एकमत होणार नाही, पण ‘सुख’ या शब्दावर जगाचे एकमत होते. सुख कोणाला नको असे नाही आणि दुःख कोणाला हवे असे नाही. पण आपले सुख शोधण्याचे ठिकाण चुकले आहे. तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी, अशी आपली अवस्था झाली आहे.
देवाकडे तीन मोठे गुण आहेत. पहिले म्हणजे वैभव किंवा ऐश्वर्य. ज्याच्या दासी रिद्धी-सिद्धी आहेत, त्या विठोबाच्या पायी आम्हाला काहीही उणे नाही. दुसरा गुण म्हणजे सत्ता. जगाचा मालक असलेल्या पांडुरंगाची सत्ता अचाट आहे. आणि तिसरा गुण म्हणजे औदार्य. तो मोक्ष देणारा दाता आहे.
वारकरी संप्रदायाला मानधनाची कीड लागली आहे. मानधन म्हणजे मानाने दिलेले धन, पण आज ते मागून घेतले जाते, त्याला मजुरी म्हणतात. अशा काळात विना मानधन, विना पावती आणि विना देणगी होणारे हे कार्यक्रम समाजासाठी आदर्श आहेत. समाज सत्तेच्या किंवा पैशाच्या मागे जात नाही, तर तो गुणांच्या मागे जातो. जिथे प्रामाणिकपणा आणि निष्कामता असते, तिथे समाज स्वतःहून धावून येतो.




