धन्वंतरी जयंतीप्रसंगी वैद्य भंडारी यांचे प्रतिपादन
परभणी : धन्वंतरी जयंतीनिमित्त परभणी येथील आयुर्वेद व्यासपीठ शाखेच्या वतीने १२ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री शिवाजी महाविद्यालय सभागृहामध्ये पुणे येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य विराज भंडारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तणावमुक्त आनंददायी मन हेच आरोग्याचे खरे धन आहे, असे वैद्य भंडारी यांनी यावेळी सांगितले. आरोग्यपर व्याख्यानाचे हे २८ वे वर्ष होते. “मणक्यांचे विकार; घेऊ आयुर्वेदाचा आधार” या विषयावर वैद्य भंडारी यांनी विचार मांडले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, तर अध्यक्षस्थानी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव होते. वैद्य भंडारी यांनी व्याख्यानात, चालण्याची बसण्याची योग्य पद्धत कशी असावी तसेच कुठला आहार विहार घेतल्यामुळे मणक्याचे आरोग्य चांगले राहील याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. डॉ.प्रताप काळे यांनी आयुर्वेद उपचाराची परिपूर्णता विशद करून त्याचा अवलंब करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक शाखाध्यक्ष वैद्य विनोद पत्की यांनी केले. सूत्रसंचालन वैद्य पूजा बाहेती यांनी केले. धन्वंतरी स्तवन स्मिता कुलकर्णी, वक्त्यांचा परिचय स्वप्नजा कळमकर यांनी करून दिला. सचिव गुरुदत्त चौधरी यांनी आभार मानले. नरेंद्र ब्रह्मपूरकर यांच्या आरोग्यदानाने सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोषाध्यक्ष वैद्य विवेक गुंडेवार, कुणाल कौसडीकर, अमोल दीक्षित, मुक्तेश्वर पारवे, एकनाथ चोपडे, पद्माकर फुटाणे, संतोष वाईकर, मनोज दीक्षित, विद्या भालेराव, मेघना मुंदडा, सुचिता चांडक, अश्विनी निर्मळ, सारिका ब्रह्मपुरीकर आदींनी परिश्रम घेतले.





