पत्रकार विलास बडे यांचे प्रतिपादन : जिंतूर तालुका प्रेस क्लब आणि व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या व्याख्यानाला मोठा प्रतिसाद
जिंतूर : काबाडकष्ट करणाऱ्या आई-वडिलांचे आणि स्वतःच्या कष्टाचे ‘स्टेटस’ ठेवण्याऐवजी आजची युवा पिढी आणि विद्यार्थी आभासी ‘स्टेटस’च्या खोट्या दुनियेच्या, खर्या चक्रव्यूहात अडकत चालले आहेत. यातून वेळीच बाहेर पडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार तथा व्याख्याते विलास बडे यांनी केले.
जिंतूर तालुका प्रेस क्लबआणि व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने रविवारी, ११ जानेवारी रोजी सायंकाळी जिंतूर येथील कन्या प्रशालेच्या प्रांगणात आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. ” चक्रव्युहात अडकलेला अभिमन्यू” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, नगराध्यक्ष प्रताप देशमुख, मुकुंद सावजी कळमकर, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, आबासाहेब जाधव, डॉ.दुर्गादास कानडकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विनोद पाचपिल्ले, राजू गारकर, प्रशांत मुळी, प्रभाकर कुरे, शंकर जाधव यांना प्रातिनिधिक स्वरूपात १५ लाखांच्या विमा पॉलिसीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विलास बडे यांनी सांगितले की, एकीकडे शेतकरी व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकला असून प्रशासकीय त्रुटी त्यांना अडचणीत आणत आहेत, तर दुसरीकडे युवा पिढी मोबाईलच्या आभासी जगात स्वतःची स्वप्ने विसरत आहे. आई-वडिलांच्या कष्टाचा विसर पडून मोबाईल स्टेटसमध्ये वेळ घालवणाऱ्या तरुणांनी वास्तवाचे भान ठेवणे गरजेचे आहे. मोबाईलच्या आणि व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी व तरुण हेच आजचे खरे अभिमन्यू असून, त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आणि स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊन, ईश्वराने दिलेल्या सुंदर मानवी जीवनाचे सार्थक करणे आवश्यक असल्याचे श्री.बडे यांनी नमूद केले. परिचय प्रा.पांडुरंग निळे यांनी करून दिला, प्रास्ताविक विनोद पाचपिल्ले यांनी केले तर सूत्रसंचालन विजय चोरडिया यांनी केले.
पत्रकार अनिल कसबे, बाबुराव चव्हाण यांचा गौरव
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनिल कसबे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर सामाजिक वार्ता पुरस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार बाबुराव चव्हाण यांना विकास वार्ता पुरस्काराने, तर नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुडा येथील अपघातात निधन पावलेले माऊली दिगंबर कदम महाराज, प्रसादराव कदम महाराज आणि दत्ता कराळे महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे अध्यक्ष मंचक देशमुख व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष भागवत चव्हाण, आनंद मुरक्या रघुनाथ गडदे आदींसह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. जिंतूर शहरातील महिला, नागरिक, तरूण, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...