परभणी जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
परभणी, दि. ०९ जुलै २०२६ : आज दिनांक ०९.०७.२०२६ रोजी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे एकापाठोपाठ चार धक्के नोंदविण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार, रात्री १.३७ वाजता मौजे पांगरा शिंदे, जिल्हा हिंगोली परिसरात ४.८६ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर रात्री २.१५ वाजता ३.६ रिश्टर स्केल, २.१७ वाजता ३.९ रिश्टर स्केल तसेच पहाटे ३.२३ वाजता ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के काकडधाबा, जिल्हा हिंगोली परिसरात नोंदविण्यात आले.सदर भूकंपाचे धक्के परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्येही सौम्य स्वरूपात जाणवल्याबाबत नागरिकांकडून जिल्हा प्रशासनास दूरध्वनीद्वारे माहिती प्राप्त झाली आहे.
सध्याच्या घडीला परभणी जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. तथापि, जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी परभणी जिल्ह्यातील नागरिकांना शांत राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल विभाग किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.नागरिकांनी भूकंपानंतर आवश्यक ती खबरदारी घ्यावी. इमारतींमध्ये तडे, इतर संरचनात्मक नुकसान अथवा कोणतीही धोकादायक परिस्थिती आढळल्यास त्याची त्वरित माहिती संबंधित प्रशासनास द्यावी.





