दत्त संप्रदाय, शिष्य परिवारावर शोककळा; श्रीक्षेत्र गुंज येथे होणार अंत्यसंस्कार
परभणी : शिवाश्रम, गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील परमपूज्य कालिदास महाराज बोरीकर यांचे शुक्रवार, १७ जुलै २०३६ रोजी सकाळी अपघातात दुर्दैवी निधन झाले. गुजरात मधील गरुडेश्वर येथील एक धार्मिक कार्यक्रम आटोपून महाराज छत्रपती संभाजीनगर येथे येत होते. धुळे-सोलापूर महामार्गावर निपाणी फाट्याजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती कळताच महाराजांचा शिष्यपरिवार धावून आला. शहरातील एका खाजगी रुग्णालयात महाराजांना दाखल करण्यात आले परंतु काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यावेळी महाराजांसमवेत त्यांच्या लहान भावाची पत्नी स्मिता हणमंतराव बोरीकर रा. सातारा या देखील होत्या. त्यांचेही या अपघातात निधन झाले. महाराजांच्या दुसऱ्या लहान भावाचे जावई सेलूचे आशुतोष डुघरेकर हे देखील या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील संस्कार उद्या शनिवारी, १८ जुलै रोजी सकाळी गुंज येथे होणार आहेत. महाराजांचा केवळ मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात व इतर राज्यात देखील खूप मोठा शिष्य परिवार आहे. परमपूज्य कालिदास महाराज हे ब्रह्मचारी व मौनी होते. केवळ दत्त गुरूंच्या आराधनेची पंचपदी वगळता ते कायम मौनात असत. कालिदास महाराजांच्या निधनामुळे सर्वदूर पसरलेल्या त्यांच्या शिष्य परिवारावर शोककळा पसरली आहे.
दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार
परमपूज्य कालिदास महाराज यांनी मागची ४० वर्षे मौनव्रत स्वीकारून महाराष्ट्रभर दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. हजारो लोकांना भक्तिमार्गाला लावून समाज सत्कार्यी लागावा, निर्व्यसनी व्हावा यासाठी त्यांनी अविरतपणे काम केलं. अध्यात्म, तपश्चर्या आणि सेवाभावासाठी ते ओळखले जात होते. त्यांनी सुमारे ४० वर्षे अखंड मौनव्रत पाळल्यामुळे त्यांची विशेष ख्याती होती. मौन असूनही ते भाविकांना आशीर्वाद देत आणि अनेक जण त्यांना संतस्वरूप मानत. साधेपणा, संयम, ईश्वरभक्ती आणि लोककल्याण यांचा संदेश त्यांनी आपल्या जीवनातून दिला. त्यांच्या निधनामुळे भक्तपरिवारात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मौनातून अध्यात्माचा संदेश देणारे परमपूज्य कालिदास महाराज यांचे तपस्वी जीवन, त्याग, साधना आणि आध्यात्मिक प्रेरणा भाविकांच्या स्मरणात सदैव राहतील.





