बाळगोपाळांच्या दिंड्यांनी वेधले लक्ष
सेलू : ग्यानबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारामच्या जयघोषात आषाढी एकादशी निमित्त जिल्ह्यातील विविध शाळांनी शनिवारी, २५ जुलै रोजी उत्साहात ज्ञान, पर्यावण, प्रबोधन दिंड्यांचे आयोजन केले होते. हरीनामाचा जयघोष करीत, श्री विठ्ठल रुक्मिणी व विविध संतांच्या वेशभूषांतील बाळगोपाळांनी लक्ष वेधून घेतले.
परभणी, सेलू, जिंतूरसह विविध तालुक्याच्या ठिकाणी व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळांनी जल्लोषात काढलेल्या दिंड्यांमुळे वातावरण भक्तिमय झाले होते. विविध पक्ष सामाजिक संघटना यांच्या वतीने ठिकठिकाणी दिंड्यांचे उत्साहात स्वागत करून फराळ तसेच पाणी वाटप करण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषा, वारकरी पेहराव, ढोलताशे, लेझीम पथकांनी वातावरणात चैतन्य फुलविले होते. बालवारकर्यांनी टाळ, मृदंग, वीणा चिपळ्यांच्या साथीने सादर केलेल्या पावल्या, भजन, गवळण, भारुडांना प्रतिसाद मिळाला. भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सेलू शहरात विविध शालेय दिंड्यांचे स्वागत करून बालवारकर्यांचा उत्साह वाढविला. यासोबतच नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे तसेच साईबाबा बँकचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, नगरसेवक मिलिंद पवार, शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने, संदीप लहाने यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी दिंड्याचे स्वागत केले.




