पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी
प्रतिनिधी | पाथरी : पावसाअभावी पाथरी तालुक्यातील खरीप पिके आणि ऊस धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाथरी तालुक्यातील कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा हंगामात आतापर्यंत सरासरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाथरी तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेला ऊस करपत आहे. खरीप पिकांची अवस्थाही बिकट झाली आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याचे संकटही दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.सध्या जायकवाडी धरणाचे काही दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने, ते पाणी उजव्या कालव्यातून पाथरी तालुक्यातील कालव्यांना सोडावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्याची पावसाची तुट लक्षात घेता पाण्याचे नियोजन केल्यास खरीपातील सर्व पिकांना त्याचा फायदा होईल. तसेच जमिनीतील पाण्याची पातळीही वाढण्यास मदत होईल.यावेळी धनंजय गणेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालय, पाथरी यांना ३ ऑगस्ट सोमवार रोजी देण्यात आले. याची प्रत जायकवाडी उपविभागीय अभियंता, पाथरी यांनाही देण्यात आली आहे.निवेदनावर उपसभापती श्याम उत्तमराव धर्मे, सरपंच शरद आबासाहेब यादव,माजी उपसभापती रमेश संतोष तांबडे, सरपंच अण्णासाहेब शिवाजीराव झुटे, आंशिराम आण्णासाहेब खामकर, दशरथ नामदेव मोरे, केशव सुखदेव जाधव, प्रकाश बापुराव चव्हाण, हरिभाऊ उत्तमराव जाधव, विलास रणजितराव यादव यांच्यासह मोठ्या संखेने शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.पाथरी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी या मागणीत सहभागी आहेत. पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने तातडीने पाणी सोडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.-





