स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शन
सेलू : येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात नुकतेच दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना इंजिनिअर भास्कर कोलते यांनी ‘कष्ट माणसाचे मनगट मजबूत करतात, तर ग्रंथ हे मस्तक सशक्त करतात,’ असे महत्त्वपूर्ण मत मांडले.
इंजिनिअर कोलते म्हणाले की, कष्ट करून माणूस मोठा होतो, पैसा आणि शरीर कमावतो; परंतु केवळ पुस्तके वाचूनच तो ज्ञानसंपन्न होतो. जीवनात काही मिळवण्यासाठी श्रमप्रतिष्ठा जपणे महत्त्वाचे आहे. वैचारिक प्रगल्भता येण्यासाठी वाचन संस्कार आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना चार लोकांशी संवाद साधण्यासाठी ज्ञान असणे गरजेचे आहे, आणि हे ज्ञान ग्रंथ व वृत्तपत्रे वाचल्याने मिळते. वाचनातूनच माणसाचे व्यक्तिमत्त्व घडते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या युगातही ग्रंथालयाने दिवाळी अंक उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, त्यांना वाचनाची आवड असूनही व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे सवड मिळत नाही, पण ग्रंथालयाच्या बाजूने जाताना ते ग्रंथांचा सुगंध घेतात.
याप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून बोलताना श्रीपाद कुलकर्णी म्हणाले की, दिवाळी अंक वाचण्याचा आनंद खूप वेगळा असतो. दिवाळी अंक विविध विषयांवर, दर्जेदार लिखाणासह प्रकाशित होतात. विनोदी, साहित्यिक, विशेषत: महिलांना आवडणाऱ्या अंकांची तसेच भविष्य आणि वास्तुशास्त्रावरील अंकाची यात रेलचेल असते. त्यामुळे सर्वांनी येथील दिवाळी अंकांचे आवर्जून वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. कैलास आवटे आणि महेश खारकर यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाची सांगता गझलकार दाम्पत्य सौ. अश्विनी विटेकर आणि संजय विटेकर यांच्या गझलने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले, तर ग्रंथपाल महादेव आगजाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनंत थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाला ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खारकर, डॉ. शरद ठाकर, प्रा. के. डी. वाघमारे, प्रा. अनंत मोगल, डॉ. राजाराम झोडगे, डॉ. सुरेश उगले, पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्यासह वाचक, सभासद आणि कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





