दिवाळी, हा भारतीय संस्कृतीचा आत्मा! हा केवळ दिव्यांचा, फराळाचा आणि रोषणाईचा सण नाही, तर तो आपल्या अंतरंगातील ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ (अंधारातून प्रकाशाकडे) या सनातन तत्त्वज्ञानाची मूर्तिमंत अभिव्यक्ती आहे. हा सण आपल्याला हे शिकवतो की जीवनातील प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात आशेची एक लहानशी ज्योत तेवत असते आणि त्याच ज्योतीने संपूर्ण वातावरण उजळून निघते. प्रभू रामचंद्रांचे अयोध्येत आगमन असो वा नरकासुराच्या अत्याचाराचा अंत, दिवाळी नेहमी वाईटावर चांगल्याच्या, अज्ञानावर ज्ञानाच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नैराश्यावर सकारात्मक ऊर्जेच्या विजयाची गाथा सांगते. याच विधायक ऊर्जेचा संचार समाजातील प्रत्येक घटकात व्हावा. अशीच प्रार्थना.
तरुणाई : नव्या भारताचे भविष्य आणि ज्ञानाचा प्रकाश प्रिय तरुण मित्रांनो आणि ज्ञानार्थी विद्यार्थी बंधू-भगिनींनो, तुम्ही भारताचे भविष्य आहात. तुमच्या हातात केवळ पुस्तके आणि गॅजेट्स नसून, एक उज्ज्वल उद्यानाची किल्ली आहे. या दिवाळीत तुम्ही ज्ञान-दीप प्रज्वलित करा आणि ज्ञानाचा प्रकाश तुमच्या विचारांना नवी दिशा देईल. तसेच, तुमच्या ध्येयपूर्तीसाठी उत्साहाचा आणि सकारात्मकतेची अभेद्य ऊर्जाचा दिवा नेहमी तेवत ठेवा, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे लक्षात ठेवा. याव्यतिरिक्त, गरजू विद्यार्थ्याला मदत करून आणि पर्यावरणाची काळजी घेऊन तुम्ही आपले सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारा. समाज परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले तुमचे एक पाऊल, हजारो दिव्यांच्या प्रकाशापेक्षा अधिक महत्त्वाचे ठरेल.
महिलाशक्ती : घर आणि समाजाचा आधारस्तंभ मातृशक्ती आणि कार्यक्षम भगिनींनो, तुम्ही लक्ष्मी आणि सरस्वतीचे रूप आहात. घराला घरपण देणारी शक्ती म्हणजे तुम्ही! या दिवाळीत केवळ घराची सजावट नव्हे, तर तुमच्या आत्मिक सक्षमीकरणाकडे लक्ष द्या आणि आत्मसन्मानाचा दिवा लावा. कुटुंबासाठी झटताना आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच, वंचित भगिनींना शिक्षण, व्यवसाय किंवा आरोग्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या जीवनात स्वावलंबनाचा आणि सन्मानाचा समानतेचा प्रकाश आणा.
शेतकरी राजा : कृषी-संस्कृतीचा आधार काळ्या आईची सेवा करणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्या घामातूनच जगाला अन्न मिळते. या दिवाळीत मागील संकटांना विसरून आशेचा नंदादीप मनात तेवत ठेवा. नवीन पीक-पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापनाचे नवे प्रयोग करा. एकमेकांना मदत करून, गट स्थापन करून एकत्रित शक्ती दाखवा. नैराश्याच्या क्षणी कुटुंबाशी आणि मित्रांशी संवाद साधा; आत्महत्या नाही, आत्म-सन्मानने जगणे हाच तुमचा खरा विजय आहे.
श्रमिक बांधव : श्रमाची खरी संपदा रोजच्या जगण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या माझ्या कष्टकरी आणि श्रमिक बंधूंनो, तुमच्या श्रमावरच आधुनिक समाजाची इमारत उभी आहे. तुमच्या कामाचा अभिमान बाळगा आणि कामाचा गौरव करा. तुमच्या मुलांसाठी बचत आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित करा; शिक्षण हाच गरिबीचा अंधार दूर करणारा खरा दिवा आहे. वर्षभर केलेल्या कष्टानंतर सर्व चिंता विसरून आपल्या कुटुंबासोबत या उत्सवात सहभाग घ्या.
सकारात्मकतेचा संकल्प करूया : दिवाळी म्हणजे ‘दिवा आणि आळी’ अर्थात दिव्यांची रांग. आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये सकारात्मकतेचा दिवा लावून, त्याला दुसऱ्याच्या दिव्यासोबत जोडून सकारात्मक दिव्यांची एक अखंड रांग तयार करूया. चला, या दिवाळीत केवळ घरच नाही, तर आपले मन, आपले विचार, आणि आपला समाजही स्वच्छ व प्रकाशित करूया. याच विधायक संकल्पाने आपल्या सर्वांचे जीवन सुख-समृद्धीने उजळून निघो! तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा !





