फुलचंद भगत, वाशिम:- जिल्हास्तरीय ‘उत्सव आजादी का’ सांस्कृतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा, सुपखेला येथे सत्कार सोहळा संपन्न झाला.सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना व विविध पैलूंना आकार मिळतो.यातून केवळ त्यांचा व्यक्तिमत्त्व विकासच होत नाही,तर ते खऱ्या अर्थाने बहुआयामी बनतात, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन वाशीम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव चंद्रकांत ठाकरे यांनी केले.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘उत्सव आजादी का’ या सांस्कृतिक स्पर्धेत यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा,सुपखेला वाशिम च्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची उत्कृष्ट परंपरा कायम राखत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रथम क्रमांक पटकावला.या घवघवीत यशाबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यासाठी एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी संस्थेचे सचिव तथा माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,शालेय जीवनात केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता, विद्यार्थ्यांनी कला आणि सांस्कृतिक क्षेत्रांतही तितक्याच हिरिरीने सहभाग नोंदवला पाहिजे. अभ्यासासोबतच शाळेतील विविध छंद मंडळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली सक्रियता दाखवणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे, असा कानमंत्रही त्यांनी या वेळी दिला.या गौरव सोहळ्याला यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचे प्राचार्य सी.एम.ठाकरे, उपप्राचार्य एस.बी. चव्हाण यांच्यासह पी. व्ही.पवळ,आर.आर. पडवाळ,जी.टी.मोरे, अश्विन चांदणे आणि ए.ए.गवळी,रमेश पडवाळ आदी मान्यवर व शिक्षकवृंद उपस्थित होते.यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून,सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





