सेलू शहरात स्मार्ट मीटर सक्तीवरून नागरिकांचा तीव्र संताप
सेलू : शहरात एनसीसी लिमिटेड कंपनीमार्फत सुरू असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय बळजबरीने मीटर बसविणे तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी नागरिकांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना बुधवारी, ११ मार्च रोजी निवेदन दिले. नवीन मीटरमुळे अवाजवी वीज बिले येत असून, बिल भरण्यास उशीर झाल्यास रिमोट प्रणालीद्वारे वीज पुरवठा खंडित केला जातो. विशेष म्हणजे बिल भरल्यानंतरही वीज पूर्ववत होण्यास १० ते १२ दिवस लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
काही स्थानिक कंत्राटदारांकडून मीटर बदलण्यासाठी दबाव टाकला जात असून, हा प्रकार न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. उपकार्यकारी अभियंता श्री शंकरवार यांनी निवेदन स्वीकारले असून, वरिष्ठांकडून लेखी आदेश येईपर्यंत एनसीसी कंपनीला सक्ती न करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या निवेदनावर शेख रहीम, अशोक अंभोरे, कॉम्रेड रामकृष्ण शेरे, कॉम्रेड दत्तूसिंग ठाकूर, नगरसेवक विनोद धापसे, श्री.शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





