जीवित व वित्तहानी नाही, जिल्हाधिकारी गुप्ता यांची भूकंपग्रस्त गावांना भेट

परभणी/हिंगोली : गुरुवारी, ९ जुलै २०२६ च्या मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास भूकंप झाल्याने हिंगोली जिल्हा हादरला. अनेक गावातील नागरिकांनी रात्र जागून काढली. भयभीत झालेल्या नागरिकांनी घरात झोपण्याऐवजी बाहेर अंगणातच झोपण्याची व्यवस्था केली. कळमनुरी, वसमत तालुक्यातील गावातील घरांना भूकंपाच्या धक्क्यांनी तडे गेले.
भूकंपाचे एकामागून एक तब्बल ४ धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गुरूवारी मध्यरात्री १:३७ वाजता बसलेला पहिला धक्का सर्वात तीव्र होता, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ एवढी नोंदवली गेली. आफ्टरशॉक्स (नुकतेच आलेले इतर धक्के) यानंतर पहाटे २:१५ वाजता (तीव्रता ३.६), २:१७ वाजता (तीव्रता ३.९) आणि पहाटे ३:२३ वाजता (तीव्रता ४.१) असे आणखी तीन धक्के जाणवले. या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि शिरळी गावाजवळ जमिनीखाली १० किमी खोलीवर होता. या भूकंपाचे हिंगोली शहरासह वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी तसेच शेजारील परभणी, नांदेड आणि लातूर (उदगीर) जिल्ह्यांतील काही भागांतही हे धक्के जाणवले. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. काही घरांना किरकोळ तडे गेल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकारी गुप्ता यांनी भूकंपग्रस्त गावांत पाहणी, ग्रामस्थांशी संवाददरम्यान, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भूकंपग्रस्त वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे व शिरळी खापरखेडा या गावांना भेट देऊन भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, संबंधित विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, भूकंपबाधित गावांचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.
भूकंपाच्या अनुषंगाने गावपातळीवर तातडीच्या कामांसाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येकी १ लाख रुपये राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. तसेच अंगणवाडी व शाळांच्या इमारतींची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या बांधकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सांगितले. भूकंपामुळे ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पात्र लाभार्थ्यांचे घरकुल योजनेचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देत, शासनाच्या इष्टांकानुसार घरकुले मंजूर करण्यात येतील, असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भविष्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा विचार करून भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून घरकुलांची उभारणी करण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही नमूद केले. सुरक्षित, टिकाऊ आणि दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. भूकंपानंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी केले. तसेच या भूकंपामुळे कळमनुरी तालुक्यातील बोल्डा या गावातही सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे घरातील भांडी आणि इतर साहित्य कोसळल्याचे नागरिकांनी सांगितले.





